सातारा, दि. 19 (प्रतिनिधी) –
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शासन निर्देशानुसार रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजोग कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यामांशी बोलताना दिली.
गेले दीड वर्ष काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता.
अस्वछता, मनमानी कारभारासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरी कोणालाही दोष न देता सर्वांच्या सहकार्याने रुग्णालयाच्या कामाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाईल. रुग्णालयात धूळ खात पडून असलेल्या कोट्यवधींच्या मशिनरी वापरात आणणार आहे.
खाजगी रुग्णालयात अथवा प्रयोगशाळेत काम करतात, चालवतात त्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही. कट प्रॅक्टिसच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार असून कोणताही रुग्ण खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळेत जाणार नाही. 108 रुग्णवाहिका चालकांनाही त्याप्रमाणे सूचना करण्यात येतील.
रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी रुग्णांशी उद्धट वर्तन करत असल्याच्या तक्रारी आल्यास तातडीने कारवाई केली जाईल. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रक्रिया गतिमान करण्यात आल्याने हा ताण कमी होणार आहे.
पुढील वर्षीचा कायाकल्प पुरस्कार जिल्हा रुग्णालयात मिळेल, या दृष्टीने काम करणार आहे. विविध प्रकरणे हाताळताना सह्यांवरून रुग्णालयात अंतर्गत नाराजी आहे. चुकीचे काम दुरुस्त करताना वेळ लागतो. शासन निर्देशाचे उल्लंघन होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.