लाहोर : शुक्रवारी पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रॅली काढत जनतेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी तेथे बोलताना सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. आरएसएस ही हिंदू कट्टरपंथीय संघटना आहे. ते मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्व अल्पसंख्यांकाचा द्वेष करतात असे इम्रान म्हणाले.
आरएसएसचा हिंदू महानतेवर विश्वास असून शेकडो वर्ष मुस्लिमांनी भारतावर राज्य केले त्यामुळे ते मुस्लिमांचा द्वेष करतात. हिटलरच्या नाझी पक्षाच्या मार्गावरुन त्यांची वाटचाल सुरु आहे. त्यांनी सुद्धा अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले. आरएसएसची स्थापना झाली तेव्हापासून त्यांना भारतात मुस्लिम नको होते आणि हे सर्व त्यांच्या योजनेनुसार चालू आहे.
काश्मीर आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 50 वर्षात पहिल्यांदा काश्मीर मुद्दावर चर्चा झाली. ब्रिटनमधील खासदार आणि अमेरिकेतील सिनेटर्सनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे. वास्तविक संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर भारताबरोबर चर्चा करुन मार्ग काढावा असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेसह संयुक्त राष्ट्राने काश्मीर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले आहे. तरीही इम्रान खान सातत्याने आपल्या देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत.