पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान आहेत. मात्र, या स्वतंत्र भारतात केंद्रात सत्तेवर आल्यापासून करोनाचे कारण पुढे करत तुघलकी निर्णय घेत पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्च 2020 ला देशात लॉकडाऊन जाहीर करत कोट्यवधी भारतीयांवर उपासमारीची वेळ आणली. त्यामुळे हा दिवसही केंद्राने महापश्चाताप दिन म्हणून साजरा करावा, अशी खोचक टीका कॉंगेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
तिवारी म्हणाले, देशात करोना रुग्णांची संख्या शेकड्यांमध्ये असताना पंतप्रधान मोदी यांनी टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे देशभरात तब्बल साडेआठ कोटी परप्रांतिय मजूरांना पायपीट करावी लागली. फाळणीच्या वेळ केवळ 40 लाख लोकांचे स्थलांतर झाले होते. मात्र, फाळणीनंतरचे हे देशातील सर्वात मोठे स्थलांतर होते. त्यान अनेकांना उपासमारीने तसेच अपघातांनी जीव गमवावा लागला. यावेळी देश स्वतंत्र असतानाही या निर्णयामुळे भारतीयांना हाल, अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यामुळे पंतप्रधानांनीच या निर्णयाचे प्रायश्चित म्हणून तो दिवस महापश्चाताप दिन म्हणून साजरा करावा अशी टीका तिवारी यांनी केली.