अस्तरीकरण गरजेचे ः पाणी घेण्यासाठी कालवे फोडीच्या घटना
मंचर-डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु सागर)उजव्या कालव्याला सिमेंट अस्तरीकरण होणे गरजेचे आहे. मोठया प्रमाणात पाण्याची गळती होवुन पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली असून कालव्यांना येणारे पाणी घेण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकरी कालवे फोडतात. त्यामुळे कालव्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
डिंभे धरणाचा उजवा कालवा आंबेगाव व शिरूर तालुक्यातुन जातो. सध्या उजव्या कालव्याचे पाणी बंद झाले असून या कालव्याला पाणी आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कालवा फोडून शेतकरी पाणी घेतात. बऱ्याच ठिकाणी कालवा फोडून पाणी घेतले असल्याने कालव्याला असणारे सिमेंट कॉंक्रिट तुटले आहे. काही ठिकाणी माती टाकून कालवा बुजवला आहे. पण पुढीलवेळी कालव्याला पाणी आल्यावर पाण्याच्या दाबाने या ठिकाणी कालवा फुटू शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कालव्याचे कॉंक्रिट तोडले आहे. काही ठिकाणी कॉंक्रिट तुटून गेले आहे. अशा ठिकाणी कालवा दुरूस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा कालव्याला गळती होऊन कालवा फुटून जाण्याची शक्यता आहे. कालव्याला गळती होऊन कालवा फुटला तर मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाने डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाची कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा त्या ठिकाणी पाणी गळती होऊन कालवा फुटण्याची शक्यता आहे.