अंजली खमितकर
पुणे -करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मानसिक ताण कमी करण्यासाठी “डार्क चॉकलेट’ खा, असा अजब सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिला आहे. यावर आहार तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्तकेले आहे. असा सल्ला “हास्यास्पद आहे,’ असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
करोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे, याबाबतचा सल्ला देणारे पोस्टर डॉ. हर्ष वर्धन यांनी नुकतेच ट्विट केले. त्यामध्ये अनेक पदार्थांचा उल्लेख आहे. त्यातील “डार्क चॉकलेट खाल्ल्यास मानसिक ताण कमी होईल,’ याविषयी अनेकांनी त्यांना प्रश्नही विचारले आहेत. मात्र, त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही.
मुळात चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात, साखरेचे प्रमाणही जास्त असते. प्रथिने मिळवण्यासाठी त्याचा खरेच उपयोग होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. याशिवाय करोना झाल्यानंतरही पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी आहार महत्त्वाचा ठरतो. या काळात तर शरीरातील सर्व प्रथिनांचा जवळपास ऱ्हासच होतो आणि रक्तातील साखर वाढते. अशावेळी चॉकलेट खाणे कितपत योग्य आहे, असा सवालही नेटिझन्सनी विचारला आहे.
तणाव कमी करण्याचा उपाय ः केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सल्ल्यावर मतांतरे
“डार्क चॉकलेट खा’ वगैरे सल्ले हे “मार्केट गिमिक्स’ आहेत. यापेक्षा तुम्ही रुग्णाला गूळ, खजूर द्या. कारण कोविड काळात अनेकांच्या शरीराची गरज ही आयर्नची आहे. त्यामुळे फुफ्फुसांची क्रयशक्ती वाढते. रेमडेसिविरसारखी इंजेक्शन्स दिली असतील, तर नंतरच्या रिकव्हरीसाठी गूळ आणि खजूर हा उत्तम पदार्थ आहे. मुळात पॅकेट्स फूड जे आहेत त्यामध्ये रंग, प्रिझर्वेटिव्हज, अन्य अनेक कृत्रिम गोष्टी असतात, ज्या शरीराला एरव्हीही अपायकारकच असतात. त्यातलाच “चॉकलेट’ हा प्रकार आहे. त्यामुळे खरे तर गुळाला काहीच पर्याय असू शकत नाही. बाधित रुग्णालयात असेल तर तुम्ही त्यांनाही डब्यात देऊ शकता. खजुरामुळे शरीरातील साखर वाढत नाही, तर ती चॉकलेटमुळे नक्कीच वाढते. फुफ्फुसांच्या रिकव्हरीसाठी तर खजूर अतिशय उपयुक्तअसल्याबाबतचे संशोधनही झाले आहे.
– ज्ञानदा चितळे, आहारतज्ज्ञ.
या सल्ल्यांमुळे केवळ एवढेच होऊ शकेल की “डार्क चॉकलेट’चे शॉर्टेज निर्माण होईल. मुळात काही लोक काही गोष्टी खाऊ शकत नाहीत कारण त्यांचे ते अन्नच नाही. त्या बदल्यात शाकाहारी पदार्थांचा पर्याय असू शकतो. पण, तो चॉकलेट असू शकत नाही. मागच्या लॉकडाऊनमध्ये पदार्थाचे अनेक प्रयोग अनेकांनी घरात केले आणि वजनही वाढवले. तो अनुभव लक्षात घेता, यावेळी लोकांनी थोडा संयम ठेवला आहे. मात्र, या सल्ल्यामुळे आता अधिकृत परवानगी (एक्स्यूज) मिळाली आहे, असे अनेकांना वाटू शकेल. यामध्ये सुशिक्षित लोकांचाही समावेश आहे.
– आश्लेषा भागवत, आहारतज्ज्ञ.