मुंबईत इच्छूकांच्या बैठका सुरू
पुणे : लोकसभा निवडणूकीत एक पाऊल मागे घेत निवडणूका न लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या रेटयापुढे आता पक्षाने विधानसभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला असून पुण्यातील आठही जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. दरम्यान, पुण्यातील उमेदवारांची यादी निश्चित झाली असून या महिन्याच्या अखेरीस ती जाहीर केली जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागसकर यांनी प्रभातशी बोलताना दिली. त्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत इच्छूकांच्या बैठका सुरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच पुण्यातून प्रत्येक मतदारसंघासाठी दहा पेक्षा अधिक इच्छूकांनी तयारी दर्शविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूकांनतर मनसेने निवडणूका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचीही भूमिका घेतली आहे. त्याच वेळी राज्यात मनसेने आघाडीत सहभागी व्हावे अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असली तरी कॉंग्रेसकडून अद्यापही त्याबाबत काही भूमिका न घेतल्याने मनसे आघाडीत राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविली जाणार की नाही याबाबत चर्चांना उधान आलेले असतानाच; पक्षाकडून राज्यात 100 जागांवर निवडणूक लढविली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
मनसेकडूनही याबाबत निर्नय घेण्यासाठी पक्षाच्या बैठका सुरूच आहेत. या बैठकांमध्ये पुण्यातील काही पदाधिकारी विधानसभेलाही पक्षाने थांबावे अशी भूमिका घेत होते.मात्र, इच्छूकांनी त्यास नकार देत पाच वर्षे तयारी केली असून आम्ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट करत निवडणूक लढविण्याचा आग्रह ठाकरे यांच्याकडे धरला होता. अखेर मनसेने इच्छूकांच्या मागणीनुसार, ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून पुण्यात आठ जागांवर तसेच जिल्ह्यातही उर्वरीत 10 ते 12 जागांवर मनसेकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याच वेळी मनसेकडून राज्यात केंद्र व राज्यशासना विरोधात घेण्यात आलेल्या सभांचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना झाला होता. त्यामुळे मनसेने विधानसभेसाठी उमेदवार दिल्यास त्याचा फटका आघाडीला बसणार की युतीला हे निवडणूक निकालानंतरच समोर येणार आहे.
पुण्यात मनसेकडून आठही जागांसाठी इच्छूक आग्रही आहेत. त्यानुसार, पक्षाकडून सर्व आढावा घेतला असून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातही 10 ते 12 ठिकाणी पक्षाकडून उमेदवार दिले जातील. पक्षाची पुण्याची यादी तयार असून इच्छूकांना मुंबईत बोलवून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची यादी या महिना अखेरीस जाहीर केली जाईल.- राजेंद्र वागसकर ( मनसे नेते)