नामांकित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट होण्याचा मिळाला मान
बारामती- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्यात आपल्या वैविध्यपूर्ण गुणवत्तेने महत्त्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेमध्ये स्वायत्तता मिळवून एक पाऊल पुढे टाकले आहे. विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’, डीएसटी, डीबीटी, सीपीई, नॅक रि-ऍक्रीडीटेंशन “अ+’ दर्जा अशी अनेक मानांकने मिळविणाऱ्या या महाविद्यालयाने आता शैक्षणिक स्वायत्तता मिळवून भारतातील नामांकित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट होण्याचा मान पटकावला आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव जवाहर शाह-वाघोलीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या शैक्षणिक स्वायत्ततेमुळे महाविद्यालयात सुरू असणाऱ्या पदवी स्तरावरील 25 व पदव्युत्तर स्तरावरील 18 अभ्यासक्रमांमध्ये आता कालसुसंगत, राष्ट्रीय शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेस अग्रक्रम देणाऱ्या कालानुरूप व्यावसायिक अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. याच्या जोडीला विद्यार्थ्यांना विविध व्यावहारिक कौशल्ये प्राप्त व्हावीत म्हणून 70 पेक्षा अधिक लघू आणि दीर्घ कौशल्याधिष्ठित सर्टिफिकेट कोर्सेस देखील निर्माण केले गेले आहेत. या कोर्सेसद्वारे विद्यार्थी कोणत्याही ज्ञान शाखेतील कौशल्ये आत्मसात करू शकेल व निश्चितपणे आजच्या तंत्र ज्ञानयुगात उपलब्ध असणाऱ्या अनेक संधी त्यास सहजपणे उपलब्ध होतील.
शैक्षणिक स्वायत्ततेसोबत महाविद्यालयाने सुरु केलेले क्रेडीट सिस्टीमद्वारे मूल्यांकन परीक्षा पद्धती आणि सेमिस्टर सिस्टीमप्रमाणे योजलेली अभ्यासक्रम रचना या नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थी त्यांच्याकडील उपलब्ध वेळेत अधिकाधिक व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करू शकतील. सोबत महाविद्यालयामध्ये अनेकविध प्रयोगदर्शी उपक्रम, रिसर्च प्रोजेक्ट्स, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील संशोधन यावर देखील भर देण्यात येत असून महाविद्यालयातील “सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह ऍण्ड ऍप्लाइड रिसर्च’ या संशोधन शाखेमार्फत विविध क्षेत्रात प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- “एम्प्लॉयबिलिटी ऍण्ड करिअर हब’
रोजगार निर्मिती व व्यवसायाभिमुख पारंगतता प्राप्त करून देणारा “एम्प्लॉयबिलिटी ऍण्ड करिअर हब’ देखील स्थापन केला आहे. देशभरातील विविध उद्योग क्षेत्रे , विविध मान्यवर शैक्षणिक व संशोधन संस्था व अनेक राष्ट्रीय प्रकल्प यांच्याशी करण्यात येत असलेल्या सामंजस्य करारांमुळे येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यास समाजात आज उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या विविध संधी सहज प्राप्त होतील आणि विद्यार्थी आपल्या कौशल्याने व आत्मविश्वासाने आजच्या वेगवान समाजामध्ये भक्कमपणे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी होऊ शकेल.