नीरेच्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने निर्णय
नीरा – नीरा-निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीतील अँसीटेक अनहायड्रेड हा घातक विषारी वायू असलेला प्लांट बंद करावा, असा ठराव नीरा (ता. पुरंदर) येथील विशेष ग्रामसभेत हात वर करून एकमताने मंजूर करण्यात आला.
नीरा-निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीतून 17 एप्रिल रोजी झालेल्या वायुगळती संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नीरा ग्रामपंचायतीत शनिवारी (दि. 1) विशेष ग्रामसभेचे सरपंच दिव्या पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी सरपंच राजेश काकडे, ग्राम पंचायतीचे सदस्य राजेश चव्हाण, अनिल चव्हाण, गणपत लकडे, किरण जेधे, सुरेश जेधे, कपिल कामतकर, सचिन मोरे, वैभव कोंडे, शेखर पवार, दयानंद चव्हाण, बाळासाहेब साळुंखे, दिलीप पाटोळे, पृथ्वीराज चव्हाण, केशव जेधे यांनी ज्युबिलंट कंपनी बंद न करता कंपनीतील “अँसीटेक अनहायड्रेड’ या विषारी वायूचा प्लांट बंद करावा, असे मत व्यक्त केले. तर धनंजय धायगुडे यांनी “अँसीटेक अनहायड्रेड’ हा प्लांट बंद करून तेथील कर्मचारी इतर विभागात वर्ग करावे असे सांगितले.
यावेळी दत्ता चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या जीविताला धोका असणाऱ्या ज्युबिलंट कंपनीतील “अँसीटेक अनहायड्रेड’ या विषारी वायूचा प्लांट बंद करून तो केमिकल झोनमध्ये स्थलांतरीत करावा, कंपनीने आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे बिनशर्त तीन महिन्यांच्या आत मागे घ्यावेत, ज्युबिलंट कंपनीच्या मेन गेट समोरील रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने कंपनीने स्वतंत्र जागेत पार्किंग करावीत आदी ठराव विशेष ग्रामसभेत मांडण्यात आले. त्याला माजी उपसरपंच दीपक काकडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने अनुमोदन दिले.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य डॉ. गोरखनाथ माने, विस्तार अधिकारी एस. के. कुंभार, विजय शिंदे, रेवती भोसले, अँड. आदेश गिरमे, अशोक रणदिवे, राजकुमार शहा, भाऊसाहेब धायगुडे, फौजदार विजय वाघमारे, सहायक फौजदार विजय होले, बाळासाहेब बनकर, पोलीस हवालदार गोविंद भोसले, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, ग्रामस्थ व वार्ड नंबर 6 मधील महिला उपस्थित होत्या.
- ग्रामसभेत जोरदार खडाजंगी
विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना कंपनीच्या वतीने तांत्रिक बाबी समजून सांगण्यासाठी व कंपनीने काय उपाय योजना केली हे सांगण्यासाठी ग्रामपंचायतीने कंपनी प्रशासनाला बोलविले होते. याकरिता ज्युबिलंट कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर रमेश वझा, क्वॉलिटीचे प्रमुख धनंजय बडबडे, सतीश फरांदे, ज्युबिलंट फाउंडेशनचे अजय ढगे उपस्थित झाल्यानंतर त्यांना किरण जेधे, सचिन मोरे, वैभव कोंडे, राजेंद्र धुमाळ यांनी बाहेर काढले. त्यामुळे धनंजय धायगुडे हे मोरे, जेधे, कोंडे यांच्यावर चांगलेच संतापले होते व त्याला त्यांनी जोरदार विरोध करून कंपनीला म्हणणे मांडून द्या, असे आवाहन केले. यामुळे ग्रामस्थांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहावयास मिळाले.