खोडद- जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गाने खरीप हंगाम मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून शेत नांगरणे, फणणी, रोटरणे तसेच शेतामध्ये शेण खत टाकून गवत काढून शेतजमीन निर्मळ करण्यास सुरुवात केली आहे. जुन्नर कृषी विभागाच्या वतीनेही खरीप हंगामाचे नियोजन केले जात असून गावोगावी शेतकऱ्यांबरोबर बैठका घेण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यातील बऱ्याच भागात असलेल्या जमिनीमध्ये खरीप पिकांबरोबरच नगदी पिकांचे उत्पादन घेण्यात येते.
खरीप हंगामात भात, भुईमूग, सोयाबिन, बाजरी, मका, ज्वारी व विविध प्रकारची कडधान्ये घेण्यात येतात. तालुक्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्रफळावर खरीप पिकांच्या पेरण्या केल्या जातात. ज्या भागात डिंभा, वडाज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा या कालव्यांचे पाणी फिरते त्या भागातील शेतकरी कांदा, बटाटा, टोमॅटो व अन्य पालेभाज्यांसारखी नगदी पिके घेत असतात. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या तयारीचे नियोजन करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, कृषी तंत्रज्ज्ञ बापू रोकडे यांनी सांगितले. ओतूर, नारायणगाव, जुन्नर, बेल्हा, कृषी परिमंडळाची गावांमध्ये खरिपाच्या उत्पादनाबाबत बैठकांना सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.