मुंबईचे कुलगुरू पद्मश्री. प्रा. डॉ. गणपती यादव यांचे प्रतिपादन
लोणी काळभोर- भारतामध्ये माध्यमिक शिक्षणापर्यंतच जीवशास्त्र विज्ञान अनिवार्य म्हणून शिकवले जाते. जीवशास्त्र विज्ञान हे सर्व शास्त्राचे उगमस्थान आहे. नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणार हे शास्त्र आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व शाखांमध्ये जीवशास्त्र विज्ञान हा विषय अनिवार्य करावा. तसेच त्याला गणित या विषयाची जोड द्यावी, असे मत इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबईचे कुलगुरू पद्मश्री. प्रा. डॉ. गणपती यादव यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा, एमआयटी स्कूल ऑफ कॉर्पोरेट इनोव्हेश व लीडरशीप आणि एमआयटी स्कूल ऑफ ह्युमानिटीस्च्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. यादव बोलत होते.
यावेळी नॅकचे सह सल्लागार डॉ. देवेंद्र कवडे, एमआयटी माईर्सचे ट्रस्टी प्रा. पी. बी. जोशी, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, मिटकॉमच्या संचालिका सुनीता मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, डॉ. जब्बार पटेल, कुलसचिव शिवशरण माळी, रामचंद्र पुजेरी, संगीत कला अकॉडमीचे सचिव आदिनाथ मंगेशकर, एमआयटी आयओडीचे अधिष्ठाता अनंत चक्रदेव आदी उपस्थित होते.
डॉ. गणपती यादव पुढे म्हणाले, बदल, आव्हान आणि संधी हे नवीन जगाचे नवीन त्रिमूर्ती आहेत. तंत्रज्ञान विघटनकारी आहे, म्हणूनच संपूर्ण आयुष्यभर युवकांनी विद्यार्थी राहून नवनिर्मिती व संशोधन करत राहवे. 2030 पर्यंत कोणतीही व्यक्ती गरीब राहणार नाही, प्रत्येक व्यक्तीला ग्रीन उर्जा आणि स्वच्छ पाणी मिळायला हवे, असे ध्येय संयुक्त राष्ट्राने ठेवले आहे. हे फक्त नवकल्पनांच्या माध्यमातून संशोधन करूनच साध्य होईल.
डॉ. मंगेश कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या स्वप्नरुपी पंखांना बळ देण्याचे कार्य एमआयटी एडीटी विद्यापीठ करीत असते. हे विद्यापीठ जगातील सर्वात चांगल्या विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानासोबत जोडली आहे. प्रा. पी. बी. जोशी यांनी स्वागत केले. डॉ. सुनील राय यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्नेहा वाघटकर, प्रा. पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी आभार मानले.