अरुण गोखले
माणसाचे आणि मातीचे फार जवळचे नातं आहे. मिळालेल्या मानवी जीवनाचे खरे तर प्रत्येकानेच सोने करायला हवे. नाहीतर लाख मोलाचे मानवी जीवन कवडी मोलाने मातीमोल व्हायला वेळ लागत नाही.
जेव्हा त्या विधात्याने त्याच्या इच्छेप्रमाणे सृष्टीची भव्यदिव्य रचना केली. तेव्हा त्याने आकाश, चंद्र, सूर्य, तारे, पर्वत नद्या, सागर, वृक्ष, वेली, असा सर्व देखणा निसर्ग तयार केला. त्याने स्वच्छंदी पक्षी, रंगीत सुगंधी फुले, भिरभिरणारी फुलपाखरे, लहान मोठे विविध आकाराचे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचीही निर्मिती केली. पण एवढे करूनही त्याच्या मनाचे काही पूर्ण समाधान होईना.
त्या त्याच्या अतृप्तीतूनच मानवाचा जन्म झाला. आपली नवीन सर्वांग सुंदर कलाकृती निर्माण करण्यासाठी त्या विधात्याने काय केले माहीत आहे? त्याने घेतली मूठभर माती. त्या मातीत त्याने चंद्राची शीतलता, सूर्याचे तेज, आणि अमृताची माधुरी घालून ती माती कालवली. त्या मातीचा त्याने स्त्री आणि पुरुष अशा दोन बाहुल्या तयार केल्या. त्यांना त्याने रंग, रूप, आकार दिला. त्यात चेतनेचा वायू भरला.
विधात्याची ती निर्मिती पाहून देवदूतांनी त्याला विचारले, “”हे विधात्या! तू ह्या मातीच्या बाहुल्या का तयार केल्यास?”
त्यावर ईश्वर म्हणाला, “”ही माझी सर्वात सर्वश्रेष्ठ अशी कलाकृती आहे”
तेव्हा देवदूताने विचारले, “”प्रभू ही जर तुमची सर्वश्रेष्ठ अशी कलाकृती असेल तर तिच्यासाठी तुम्ही इतर कोणताही अन्य धातू न वापरता ही शुल्लक आणि जड मातीच का वापरली?”
त्यावर उत्तर देताना ईश्वर म्हणाला, “”माती हेच मानवी जीवनाच खरं रहस्य आहे. या मातीतच मी संसारातले सारे सौंदर्य, सुख, वैभव ओतप्रोत भरून दिले आहे. या जड मातीच्या पुतळ्यांमध्ये मी चेतना भरली आहे. ती चेतना, ते चैतन्य, ती शक्तीच जो ओळखेल तोच या मातीच्या जीवनाचे सोने करू शकेल.
कारण मातीत उर्जेचा, निर्मितीचा, अधिकपटीने परत देण्याचा गुण आहे. माती क्षमाशील, सहनशील आहे. या जीवनरूपी शेतात जो सद्कर्माची शेती करेल, तोच इथे सोने पिकवील. त्याच्याच कर्मफळांना अमृताची गोडी मिळेल.”
ईश्वर पुढे म्हणाला, “”जीवन हे मनुष्याला दिलेले मातीचे शेत आहे. त्याने त्याचा कसा उपयोग करायचा? हे त्याच्या हातात आहे. तो आपल्या जीवनाचे सोनेही करू शकतो आणि मातीही.”