एच. जे. नरवडे
मन आणि बुद्धी हे दोन्ही खरेतर अदृश्य अंग. मात्र तरीही त्यांची जागा निश्चित आहे. मनाची जागा हृदयात आहे, तर बुद्धीची मेंदूत. हे दोन्ही अदृश्य अंग मात्र नेहमीच एकत्र येतील असे नाही. कधी कधी जे मनाला पटते ते बुद्धीला पटत नाही आणि जे बुद्धीला पटते नमके तेच मनाला पटत नाही. जेव्हा मन आणि बुद्धी एकाच वेळी एकमत दर्शवितात तेव्हा तो विचार, ते कार्य सहज यशस्वी होते. देवपूजा मनाचा आहार आहे, तर सद्सद्विवेक बुद्धीने केलेला विचार बुद्धीचा खुराक आहे.
आपल्या मनाला जवळपास सर्वच रंग आवडतात. मात्र धर्माधर्मात विभागलेले रंग आपल्या बुद्धीला पटत नाही. श्रद्धा ही मनाला पटते तर अंधश्रद्धा ही बुद्धीला पटत नाही. उडणारे रंगीबेरंगी फुलपाखरू हे आपल्या मनाला आणि बुद्धीलाही पटते. त्यामुळे फुलपाखरू हे आपल्याला सुंदर दिसते. त्यामुळे चांगल्यावेळी मन आणि बुद्धीचे एकमत होणे खूपच गरजेचे आहे.
मनाच्या रथाला अनेक घोडे असतात. ते त्यांना हवे तसे रथ ओढत नेतात मात्र त्या रथाचा लगाम म्हणजे बुद्धी आहे. आपल्या मनाला अनेक वासना भूरळ घालतात मात्र आपल्या बुद्धीला ते पटत नाही त्यामुळे आपली बुद्धी लगेच मनाला आवर घालते. कोणतेही अपकृत्य करण्याअगोदर मन आणि बुद्धी एकत्र आले तर आपल्या हातून अपकृत्य घडत नाही. मात्र मनापर्यंत बुद्धीचा संदेश पोहोचला नाही किंवा मनाला बुद्धीचा सल्ला आवडला नाही, तर अनेकांच्या हातून घोर पाप झाल्याचे लक्ष उदाहरणे सांगता येतील.
आकर्षक असलेले सर्वच आपल्या मनाला भावते पण बुद्धीला पटेलच असे नाही. असली नकलीचा फरक आपण बुद्धीच्या जोरावर करत असतो. मन चांगले असेल तर बुद्धीही चांगली राहते. मनात सारखे वाईट विचार येत असतील तर मानवाची बुद्धीही भ्रष्ट होते. रावणाच्या मनात सीतेला पळवून नेण्याचा वाईट विचार आला त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन त्याच्या हातून पाप घडले. त्याच्या या पापामुळेच त्याचा अंत झाला. रामाच्या चांगल्या मनाचा रावणाच्या वाईट मनावर विजय झाला. एकपत्नी, एकवचनी असे रामाचे मन असल्यामुळेच त्याच्या हातून पापपुण्याचा हिशोब झाला.
रावण महापराक्रमी, महाबलवान असूनही वाईट मन आणि भ्रष्ट झालेली बुद्धी यामुळे त्याचा रामासमोर निभाव लागला नाही. सीतेचे आपल्या पतीविषयी असलेले चांगले मनही रामाला बळ देऊन गेले. त्यामुळे मनात चांगलेच विचार यायला हवेत यामुळे आपली बुद्धीही तेज राहते. भूतकाळात आपल्याबाबत घडलेल्या वाईट घटनांचे चर्वण करत राहिल्याने मन दुःखी होते. यावेळी बुद्धीही जणूकाही साथ देत नाही. तेव्हा तुमचे मन उत्साही, ताजे टवटवीत असेल तर तुमची बुद्धीही टवटवीत राहते. त्यामुळे भूतकाळातील कटू अनुभव, कटू विचार मनातून काढून टाकणे गरजेचे आहे. साधूसंतांनी मनाला काबुत ठेवण्याविषयी सांगितले आहे. जेव्हा तुम्ही मनाला आपल्या बुद्धीने लगाम घालाल तेव्हा तुमचा उत्कर्ष होतो. नाहीतर मनासारखे वाहवत गेल्यास अधोगती निश्चित आहे.