नवी दिल्ली : चीनमध्ये करोना विषाणुने धुमाकूळ घातला असून वुहान येथून भारतात परतलेल्या 406 भारतीयांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. या सर्व जणांच्या अंतिम तपासणीत त्यांना करोना विषाणुंचे संक्रमण झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या 406 जणांना उद्या, सोमवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये करोना व्हायरस पसरल्यानंतर वुहान येथून भारतीयांना विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले होते.
या सर्व जणांना आयटीबीपीच्या विशेष केंद्रात तपासणीसाठी ठेवण्यात आले. या विशेष केंद्रातील डॉक्टरांच्या पथकांनी सर्वांचे नमुने एकत्रित केले होते. या सर्व नमुन्यांची तपासणी केल्यानंतर यात त्यांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार 406 जणांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून त्यांना सोमवारी सकाळी घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, चीनमधून 15 जानेवारीनंतर भारतात परतणाऱ्या सर्व प्रवाशांना आयटीबीपीच्या केंद्रात पाठविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.