सर्वोच्च न्यायालयाकडून याचिकांवर होणार सुनावणी
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी होकार दर्शविला. त्याचवेळी अशा स्वरुपाच्या घटना न्यायालय रोखू शकणार नाही, असेही स्पष्ट केले.
या संदर्भात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सुनावणी करताना निर्णय दिला. यावेळी न्यायाधिशांनी, वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात आमच्यावर आरोप करण्यात आल्याचे आम्ही पाहिले. पण आमच्यावरही कामाचा ताण आहे. आम्ही अशा स्वरुपाच्या घटना रोखू शकत नाही. लोकांनी मरावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही. शांतता राहावी, असे आम्हालाही वाटते. पण न्यायालय अशा स्वरुपाच्या घटना रोखू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका कॉलिन गोन्सालविस यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावेळी न्यायालयाने सुनावणी घेण्यास होकार दर्शविला.
चिथावणीखोर वक्तव्यांमुळे झालेल्या हिंसाचारामध्ये दररोज जवळपास 10 लोक मरताहेत. काल रात्री सुद्धा 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतरही 5 ते 6 नेत्यांकडून या प्रकरणी चिथावणीखोर वक्तव्ये करणे अद्याप सुरूच आहे. त्यामुळेच न्यायालयाने लवकर सुनावणी घ्यावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, असे कॉलिन गोन्सालविस यांनी आपला युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले.