आंबेगावातील स्थिती : सधन शेतकऱ्यांचा हिरवा चारा साठवणुकीवर भर
मंचर- दुष्काळी परिस्थितीमुळे आंबेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची साठवणूक केली आहे. पाऊस झाल्यानंतर हिरवा चारा उपलब्ध होईपर्यंत दुभत्या जनावरांची परवड होवू नये म्हणून शेतकरी धडपड करीत आहेत, तर ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दुभत्या गायी विकल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस, कडवळ, मक्याची मशीनमध्ये बारीक कुटी केली असून ती 100 किलोच्या पोत्यामध्ये ठेवुन जनावरांची गरज भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. काही शेतकऱ्यांनी 20 ते 25 गायी पाळल्या आहेत. पुरेसा पाऊस न झाल्याने एप्रिल महिन्यानंतर पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागला आहे, त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी दुभत्या गायी विकल्या आहेत. तर सधन शेतकऱ्यांनी कडबा कुटी मशीनमध्ये बारीक तुकडे करुन 100 किलोच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरुन ठेवत असून ऊस, मका, कडवळ बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये गुळाचे पाणी, लिक्विड टाकले जात असल्याने हे खाद्य जनावरांना चवदार लागत असल्याचे शेतकरी सांगतात.