उंडवडी-सुपेच्या शेतकऱ्यांचे बारामती तहसीलदारांना निवेदन
वासुंदे- चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करावा, या मागणीसाठी जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रशासनाला लेखी निवेदने देण्याची वेळ आली आहे. गुरुवारी (दि. 16) ग्रामपंचायत उंडवडी-सुपे (ता. बारामती) यांच्यामार्फत बारामतीचे तहसीलदार विजय पाटील आणि प्रांतअधिकारी हेमंत निकम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात शेतकऱ्यांना चारा छावणीत सहभागी होण्यासाठी जनावरांना निवारा, पाण्याची टाकी यासाठी आर्थिक खर्च आहे. चारा डेपो सुरू केल्यास मिळणारा चारा स्वखर्चाने शेतकरी घेऊन जातील, असे म्हटले असून, शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार होऊन चारा डेपो सुरू करावा, असेही म्हटले आहे.
गेल्या कित्येक महिन्यांत लाखो रुपये खर्च करूनही आत्ता जनावरं जगतील अशा आशाच राहिलेल्या नाहीत. त्यातच चारा छावणीत सहभागी होण्यासाठीचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. छावणीत जनावरांबरोबर दोन माणसे दिवस-रात्र गुंतणार आहेत, छावण्या ठिकाणी जनावरे अजारी पडल्यास याचा तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे, तसेच जनावरांचे काढलेले दूध संकलन केंद्रात नेण्यासही अडचणी येणार आहेत आणि छावणीत मिळणारा चाराही मुबलक नसल्यामुळे स्वखर्चाने जनावरांना चारा विकत घ्यावा लागणार आहे, त्यातच सध्याचे दिवस हे उन्हाळ्यातील अखेरचे दिवस असल्याने आणि पावसाची चाहूल लागताच मोठी वादळं, वीज, वारा, पाऊस यांचा मोठा धोका संभवतो आहे, त्यामुळे छावणीवरचा खर्च आणि त्यातच कमावती व्यक्ती छावणीवर राहणार यापेक्षा जनावरं बंद गोठ्यातच सुरक्षित राहतील व कोणालाही धोका पत्कारण्याची वेळ येणार नाही, त्यामुळे चारा डेपो सुरू करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.