मुंबई : दोन्ही बाजूकडून चर्चा सुरू झाली असून लवकरच त्याचा निर्णय जाहीर करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी ठाकरे यांनी चर्चा केली. तत्पुर्वी या नेत्यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना नेते आणि सामनाचे संपदक संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर एका हॉटेलमध्ये या नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा केली.
दरम्यान शिवसेना सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमावर आधारीत पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंगेसने आपली समिती बुधवारी जाहीर केली. कॉंग्रेसच्या समितीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीच्या समितीत जयंत पाटील, अजित पवार छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांचा समावेश आहे.
शिवसेनला सरकारला पाठींबा देण्याबाबत किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मंगळवारी उपस्थित केला. राज्य चालवण्याची भुमिका आणि धोरणे स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कॉंग्रेस पाठींब्याचे आश्वासन देऊ शकत नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते. किमान समान कार्यक्रमात, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेकारी भत्ता आणि नव्या उद्योगात स्थानिकांच्या नोकऱ्यांचे आरक्षित प्रमाण या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेल्या मुद्यांबाबत कॉंग्रेस आग्रही आहे, असे सुत्रांनी सांगितले.