ग्रामस्थांनी केली प्रशासनाकडे मागणी
मंचर- आंबेगाव तालुक्यातील घोडनदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडल्याने नदीपात्रात शेवाळयुक्त वनस्पती, जलपर्णी आणि मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तसेच गाळ ही नदीत मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर जलपर्णी काढण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घोडनदीपात्रात असणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती काढून घेणे गरजेचे आहे. एकलहरे गावच्या हद्दीच्या बाजूने घोडनदीच्या दुतर्फात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे. तसेच नदीपात्रामध्ये खूप प्रमाणात गाळ साचला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती झाल्यामुळे नदीपात्र कोरडे पडलेले आहे. पावसाळ्याच्या आधी शासनाने उपाययोजना करुन नदीपात्रात आढळणाऱ्या जलपर्णी काढण्यासाठी आणि नदीपात्राचे खोलीकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने कळंब येथील घोडनदी पात्र लवकरात लवकर स्वच्छ करावे आणि नदीपात्राचे खोलीकरण करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंत भालेराव, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांनी केली आहे.