मुंबई : राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या माझा डॉक्टर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत आहे. आज राज्यभरातील अगदी गाव पातळीवरील सुमारे 17 हजार 500 फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी संवाद साधून कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले.
महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो, रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या याच कुटुंबाच्या डॉक्टरांवर ठेवतात. या डॉक्टरांनाही त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रकृती माहित असते. आजही 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.
त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जात नाही, ते घरीच विलगीकरणात राहातात, उपचार घेतात, काहींना तर औषधांचीही गरज पडत नाही. पण काही रुग्ण हे काही कालावधीनंतर गंभीर होतात आणि उशिरा दवाखान्यात दाखल होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतांना दिसते. घरी रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व माझा डॉक्टरांची जबाबदारी आणि भूमिका त्यामुळे अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाची प्रकृती, त्याला असलेल्या सहव्याधी, त्याची ऑक्सीजनची पातळी, पाहतांना या रुग्णांना योग्यवेळी योग्य उपचाराचे मार्गदर्शन करणे, त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर त्यांच्या गरजेनुसार योग्य दवाखान्यात वेळेत दाखल करणे, त्यांच्यावर उपचार सुरु करणे या सर्व गोष्टींकडे त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन झाल्यास आपण मृत्यूदरही कमी करू शकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.