राजीनामा..!
निष्ठावान संघ आणि सदिच्छा प्रेमींना नमस्कार,
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळ, महिला आघाडी, पदवीधर व उच्चाधिकार समितीच्या जिल्हा कार्यकारिणींची निवड केल्याचे मी काही व्हॉट्स ऍप ग्रुप व वर्तमानपत्रांत वाचले. वास्तविक जिल्ह्यातील शिक्षकांचे मातृमंडळ आणि शिक्षक संघाच्या निवडी अशा अंधारात आणि छुप्या पद्धतीने केल्याचे मी पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच पाहिले. खूप वैषम्य आणि दुखः वाटले.
या आधीच्या कार्यकारिणी निवडीला साडेसात वर्षे झाली होती. त्यामुळे बॅंकेत पराभव झाल्यापासून जिल्ह्यातील तमाम संघ व सदिच्छा प्रेमी सभासदांची जिल्हा निवडी घेऊन सक्षम आणि सक्रिय कार्यकर्त्यांतून लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडावेत आणि जोमाने काम चालावे, अशी भावना होती. पण श्रेष्ठींनी ती लांबवत नेवून शेवटी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने संघटना व मंडळाच्या भविष्याचा विचार न करता स्वतःला सोयीचे पदाधिकारी सर्वांच्या माथी मारल्याने जिल्ह्यातील संघ व मंडळाच्या वाढीचा व हिताचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडीला आणि निवड पद्धतीलाच आक्षेप घेतला आहे.
जिल्ह्यातील शिक्षक संघ आणि सदिच्छा मंडळाचे नेतृत्व यापूर्वी भा. दा. पाटील, विष्णूदादा खांदवे यांच्यासारख्या धुरिणांनी सर्वांना बरोबर घेऊन, पारदर्शी व लोकशाही पद्धतीने विचारविनिमय करत विश्वासाने केले. म्हणूनच अनेक चढ-उतार येऊनही कार्यकर्त्यांनी आपल्या निष्ठेत बदल होऊ दिला नाही.
परंतु सद्यस्थितीत जिल्हा संघ व सदिच्छा मंडळाचे नेतृत्व मूळ विचारधारा बाजूला ठेवून स्वहितासाठी सर्व आटापिटा करताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक समूहासाठी उज्ज्वल काम करण्याची परंपरा असणाऱ्या शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. हे सर्व सहन होत नसल्याने मी नूतन कार्यकारिणीत मला दिलेल्या “प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य प्रतिनिधी’ या पदाचा राजीनामा देत आहे.
यापुढे कोणत्याही पोस्ट अथवा बातमीत माझ्याविषयी त्या पदाचा उल्लेख करू नये. यापूर्वी मला पारनेर तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष (दोनदा) आणि शिक्षक बॅंकेच्या चेअरमनपदावर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठबळामुळे काम करण्याची संधी मिळाल्याची जाणीव ठेवून या पदांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला, हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेले आहे. गेले 25 वर्षे फक्त शिक्षक संघ आणि सदिच्छा मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनच प्रामाणिकपणे आणि निष्ठेने झपाटून काम केलेले आहे आणि यापुढेही ते सदैव करीत राहील. जय संघ… जय सदिच्छा…!
आपला सहकारी, गोकुळ कळमकर, पारनेर.