एलसीबीची कारवाई; शाहूपुरी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी)
न्यायालयात सुरु असलेला खटला मागे घेत नसल्याने डोक्यात रॉड घालून युवकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या संशयिताला एलसीबीने तब्बल दीड वर्षानी अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (रा. चाहुर, ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
हा गुन्हा 5 मे 2018 रोजी मंगळवार तळ्याजवळ घडला होता त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून देसाई हा फरार होता. त्याला एलसीबीने अटक केल्यामुळे शाहूपुरी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
याबाबत एलसीबीने दिलेली अधिक माहिती अशी की, 5 मे 2018 रोजी सकाळी घराबाहेर पडलेला संदीप रात्री 11 वाजेपर्यंत घरी आला नव्हता. त्यामुळे संदीपला पाहण्यासाठी त्याचे वडील राजवाड्याकडे निघाले होते. राजवाडा परिसरातही संदीप न दिसल्याने ते पुन्हा पायी मंगळवार तळ्यावरुन निघाले होते.
त्याचवेळी त्यांना मुलगा संदीप व संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी हे दोघे दिसले. यावेळी प्रसाद जोरजोरात ओरडत होता. तू सातारा शहर पोलिस ठाण्यातील केस मागे का घेत नाहीस, तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत संशयित प्रसाद कुलकर्णी याने लोखंडी पाईपने संदीपच्या डोक्यात मारहाण केली होती.
संदीपला मारत असताना त्याचे वडील पाहत असल्याचे प्रसादच्या लक्षात आल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. दरम्यान मारहाणीच्या घटनेत रक्तबंबाळ संदीपला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले होते.
त्यानंतर मृत संदीपचे वडील रमेश भणगे यांनी चौघांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र, अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई हा तेव्हापासून फरार होता. अखेर एलसीबीने त्याला तब्बल दीड वर्षांनी अटक करून पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहाय्यक फौजदार विलास नागे, पृथ्वीरज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचन, राजकुमार ननावरे, नितीन भोसले,योगेश पोळ, संतोष जाधव,प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी केली.