दौंड तालुक्यातील ग्रामस्थांशी दुष्काळाबाबत चर्चा
वरवंड- दौंड तालुक्यातील जिरेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, पडवी, खोर या जिरायती भागातील गावांची पाहणी करून गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून या भागातील ग्रामस्थांच्या मागण्यांचा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. खासदार सुळे यांनी प्रत्येक गावात बैठका घेऊन ग्रामस्थांशी दुष्काळावर चर्चा केली.
यावेळी गणेश थोरात, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष वैशाली नागवडे, दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आप्पसाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, गणेश कदम, सारिका राजेंद्र पानसरे, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, कुसेगावचे सरपंच रमेश भोसले, विकास खळदकर, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल शितोळे पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 16) दौंड तालुक्याती जिरेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, पडवी, खोर या जिरायती भागातील गावांना भेटी दिल्या. या जिरायती भागातील गावांतून ग्रामस्थांनी प्रामुख्याने चारा डेपो व पाण्याच्या टॅंकरची मागणी केली आहे. यावर्षी पाऊस झाला नसल्याने काही गावांतील ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे, तसेच काही गावांतील बंद पडलेला प्रादेशिक पाणी पुरवठा चालू करण्यात यावा आणि गावातील तलावात पाणी सोडण्यात यावे, तसेच जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी केल्या.
दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून या गावांतील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- पाटसला विहिरीसाठी जागेची मागणी
रोटी गावातील ग्रामस्थांनी पाटस येथून पाणी आणण्यासाठी विहीर खोदण्यासाठी पाटस येथे जागा मिळण्याची मागणी केली आहे. पाटस येथून पाणी पुरवठा होण्यास सुरुवात झाली तर रोटी गावचा पाण्याचा प्रश्न मिटेल असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून जिरायती भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.