नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला क्राईम सिटी अशी ओळख निर्माण करून दिली. हेच त्यांचे कर्तृत्व. विकासाचे कोणतेच काम केले नाही उलट मलाच खोटी गुन्ह्यात अडकवले. बेकारी वाढवली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. आता तुमचे काय हाल करतील याचा विचार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर शरद पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, छत्रपतींचे स्मारक, इंदू मिलवरचे बाबासाहेबांचे स्मारक अशा सगळ्या प्रकल्पांची कामं रखडली आहेत. एक विटही रचली गेली नाही.
ते म्हणाले, राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डे’मुक्त’ राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे’युक्त’ राज्य घडवण्याचा निर्धार केला यया खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नाही.
शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला या सरकारचा विरोध आहे. आपल्या राज्यात कांद्याला चांगला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी उद्ध्वस्त झाला. या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांनी पीकविमा काढून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील 70 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.
राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या हातून सत्ता काढून घेण्याचे काम या निवडणुकीत करायचे आहे. एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी होती. पण मागील 5 वर्षांत या सरकारने राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. राज्याचा विकास किती केला यावर न बोललेलंच बरं अशी टीकाही त्यांनी केली.