पंढरपुरातील आंदोलनासाठी बारामतीत गावभेट दौरा
बारामती- “आता नाही तर कधीच नाही’, अशी भिमगर्जना करीत राज्यभरातील धनगर समाज बांधव क्रांतीदिनी (दि. 9 आँगस्ट) पंढरपूर येथून रणनिती आखणार असून समाजाकरीता लढा उभा राहत आहे. या लढ्यात सहभागी होण्याकरीता उपस्थित राहण्याबाबत गावदौरा काढून बांधवांना आवाहन केले जात आहे. यानुसार बारामती तालुक्यात आज या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती तालुक्यातून निरा वागज गावातून धनगर आरक्षणाच्या गावभेट दौऱ्याला सुरवात झाली. येथे समाजातील तरुणांनी समन्वय समितीचे जोरदार स्वागत केले. मेखळी, मळद, झारगडवाडी, सोनगाव, ढेकळवाडी, काटेवाडी, कन्हेरी व जळोची येथे आजचा दौरा झाला. यावेळी आरक्षण समन्वय समितीचे किशोर मासाळ, सुनील भगत, गणपत देवकाते, विलासराव देवकाते, डॉ. शिवाजी देवकाते, बापुराव सोलनकर, राहुल खोमणे, राहुल नाझीरकर, दिलीप नाळे यांनी मार्गदर्शन केले.
आरक्षणाच्या लढाईमध्ये बहुतांश अंदोलनातील शिलेदार एस.टी. सर्टिफिकेट मिळेपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे. या अंदोलनासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव पंढरपुरात लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे तमाम समाजबांधवांनी पंढपुरात होणाऱ्या लढ्यासाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या भुमिकेला पाठींबा देण्यासह उपोषण कर्त्यांना ताकद देण्यासह समाजाचा या सरकारवर दबाव वाढविण्यासाठी आपण आपल्या समाजातील तरुण मुलांमुलींच्या उत्कृर्षासाठी, भविष्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने केले जात आहे.
- …तर काळही माफ करणार नाही
निवडणुका येतात जातात मात्र आपल्या आरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित राहत आहे. हे अंदोलन राजकीय नसून आपल्या समाजातील तरूणांना नोकऱ्यांत, शिक्षणांत, आदी प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे प्रमुख शस्त्र आहे ते मिळाले तरच समाजाची प्रगती निश्चित आहे. अन्यथा, पुढील काळदेखील आपल्याला माफ करणार नाही, याची जाणव ठेऊनच सरकार विरोधातील लढाई लढावी लागणार आहे.