शिरूर-कोरेगाव भीमा येथील बांधकाम व्यावसायिकांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता येथील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन पाइपलाइनची तोडफोड करून येथील 14 शेतकऱ्यांच्या 80 एकर शेतीतील ऊस व इतर पिकांचे नुकसान केले आहे. तर शेतीच्या पाण्याचे व पिण्याचे पाण्याचे मोठे हाल होत असून, या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच या बांधकाम व्यवसायावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी कोरेगाव-भीमा येथील शेतकऱ्यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शिरूरचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या उपोषणाला शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी भेट देऊन तहसील कार्यालय व संबंधित बाधित शेतकरी यांच्या अडचणी सुटण्यासाठी मध्यस्थी करून तहसीलदार यांना देऊन 20 ऑगस्ट रोजी बैठक घैण्याचे ठरले आहे. या उपोषणात कोरेगाव भीमाचे तंटामुक्ती अध्यक्ष केशव फडतरे, भाजपचे कैलास सोनवणे, माजी सरपंच कल्पना गव्हाणे, पत्रकार के. डी. गव्हाणे, उपसरपंच नितीन गव्हाणे, सुनील सव्वाशे, कृष्णाबाई गव्हाणे, कमल गव्हाणे, अश्विनी सव्वाशे सहभागी झाले होते.
आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या गट नंबर 10, 60 व 518/1 या शेतामधून शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन सर्व नियमानुसार तीस वर्षांपूर्वी गेली आहे. या मिळकतीमध्ये वडगाव शेरीचे बांधकाम व्यवसायिक आदींनी कुठलीही परवानगी न घेता पाईपलाईन पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. यामुळे गेली एक वर्षापासून शेती, जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे तरी संबंधित बांधकाम व्यावसयिकांवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.