गावात राहणे धोकादायकच; सुरक्षित ठिकाणी पुनर्वसनची मागणी
भोर- कोंढरी गावात माळीणच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळल्यानंतर या गावाची भूवैज्ञानिकांकडून पाहणी करण्यात आली असून जीवालॉंजीकल तर्फे सर्व्हे करण्यात आल्यानंतर गावात राहणे धोकादायक असल्याचे भूवैज्ञानिकांकडून सुचित करण्यात आले आहे. यानुसार गावच्या पुनर्वसनाकरीता शासनाने किमान पाच एकर जागा सुरक्षित ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
भोर-महाड मार्गावरील हिर्डोशी खोऱ्यातील मौजे कोंढरी येथील भोकरीचा माळ येथे भूस्खलन होऊन डोंगरातील दरड कोसळण्याची दुर्घटना बुधवारी (दि.7) घडली. यामध्ये शेतकऱ्यांची 100 पेक्षा अधिक बांबूची बेटे, कलमी आंब्याची झाडे आणि भातखाचरे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी गावाची पाहणी करीत कोंढरी गावाचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले.
परंतु, डोंगररानात कृषी विभागाने समतल सलग चर खोदले आहेत, त्यामुळे जमिनीत अतिवृष्टी आणि खड्यात साचलेल्या पाण्याने भेगा पडून भुस्खलन होऊन जमिनीला भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे पुनवर्सन करायचेच असेल तर ते सुरक्षित जागी करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार थोपटे यांच्याकडे लावून धरली आहे. याच पार्श्वभुमीवर जमीनीची स्थिती कशी आहे, हे तपासून पाहणे गरजेचे ठरत होते. याकरीता आमदार थोपटे यांनी गावाची पाहणी भूवैज्ञानिक तज्ज्ञांद्वारे व्हावी, याकरीता प्रयत्न केले. त्यानुसार कोंढरी गावात दुर्घटना परिसरातील जमीनीची पाहणी शास्त्रीयदृष्टीने पाहणी करण्यात आली. यानुसार दुर्घटना परिसरातील जमीन घरांसाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
आमदार थोपटे यांनी ही बाब पुनर्वसन राज्यमंत्री भेगडे यांना सांगितली असून गावाचे पुनर्वसन करण्याकरीता शासनाने सुरिक्षत ठिकाणी किमान पाच एकर जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, भोर तालुक्यातील नीरादेवघर धरण प्रकल्पात या गावच्या जमिनी गेल्या असून फलटण तालुक्यातील सुरवडी येथे 52 शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले असताना कोंढरी ग्रामस्था मात्र या हक्कापासून वंचीत आहेत. यामुळेच शासनाने सुरवडी येथील गावठाणात जागा देऊन पुनर्वसन करावे, अशीही मागणी कोंढरी ग्रामस्थांनी केली असल्याचे आमदार थोपटे यांनी राज्यमंत्री भेगडे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
- कोंढरीचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्याचे प्रयत्न आहेत. याकरीता शासनाने किमान पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याकरीता पाठपुरावा सुरू असून गावकारभार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
– संग्राम थोपटे, आमदार, भोर - खासदार सुळे यांनीही केली पाहणी…
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळै यांनीही कोंढरी गावास भेट देऊन झालेल्या दुर्घटनेची पाहणी केली असून ग्रामस्थांना तातडीने मुलभुत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता शासकीय पातळीवर सूचना केल्या आहेत. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असा धीरी देत. गावाचे पुनवर्सन सुरक्षित ठिकाणीच होईल, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले.