मुंबई : केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या चिमुरड्याचा शुक्रवार (22 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता दुर्दैवी मृत्यु झाला आहे. 7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात त्याचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली होती.
याबाबतची माहिती केईएम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. नुकतेच या तीन महिन्याच्या मुलाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार होते, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार होते.
याप्रकरणी बाळाचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात विद्युत उपकरणांचा सांभाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, उपचारानंतर आयुष्याची वाटचाल सुंदर व्हावी म्हणूज उत्तरप्रदेशवरुन आलेल्या प्रिन्सच्या नशिबात वेगळाच खेळ मांडला होता. पण यात रुग्णालयाकडून दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.