पिंपरी – दैवाचा फेरा कधी कुणाला चुकला नाही, असे आपण नेहमीच ऐकतो. पनवेल येथील सधन शेतकऱ्याची आवडतील बैलजोडी चोरीला गेली. ती शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या त्या बाबांच्या मनावर त्याचा आघात झाला. ते सतत तहान-भूक हरपून भटकत बैलजोडीचा शोध घेत होते. त्यानंतर आपण काय करतोय, हे त्यांच्या लक्षात आलेच नाही. वर्षभर बैलजोडी शोधत राहिले.
सहा महिन्यांपासून ते डांगे चौकातील पुलाखाली राहत होते. कोणी काही अन्न दिले तर ते खायचे, अशी स्थिती त्यांची होती. किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी भिकाऱ्याचे जीवन जगणाऱ्या त्या वृद्धास किनारा वृद्धाश्रमात आणले. त्यांना स्वच्छ करून चांगले खाऊ पिऊ घातले. त्यांची मनस्थिती स्थिर झाल्यावर त्यांची विचारपूस केली. त्यातून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. वर्षभरानंतर त्या शेतकऱ्यांना मुलांना आपले हरविलेले वडिल भेटल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका डांगे चौकातून जात असताना पुलाखाली बसलेले आजोबा दिसले. त्यांनी मोटार थांबवून आजोबांची चौकशी केली. मात्र ते काहीच बोलत नव्हते. त्यांना आश्रमात येण्याची विनंती केली. ती विनंतीही त्यांनी धुडकावून लावली. यामुळे वैद्य तेथून घरी आल्या. मात्र आजोबांचा चेहरा आणि त्यांचे जगणे डोळ्यासमोरून जात नव्हते. तीन दिवसांनी आजोबांची समजूत काढून त्यांना किनारा येथील वृद्धाश्रमात आणले. त्यांची स्वच्छता केली. चांगले खाऊपिऊ घातले. त्यांची मनस्थिती ठीक झाल्यावर त्यांची चौकशी केली आणि आजोबांनी आपली माहिती दिली.
आजाबांनी आपले नाव आणि पनवेलचा पत्ता सांगितला. यामुळे वैद्य यांनी ही माहिती पनवेला पोलिसांना कळविली. सोबत आजोबांचा फोटोही पाठविला. दिलेल्या पत्त्यावरून पोलिसांनी आजोबांच्या घरी संपर्क साधला. दुसऱ्याच दिवशी आजोबाचे कुटूंबिय त्यांना घेऊन जाण्यासाठी किनारा वृद्धाश्रमात आले. आजोब पनवेलमधील सधन शेतकरी, तीन घरे, भरपूर शेती, गायी-गुरे आहेत. पत्नी आणि एकुलता एक मुलगा, असे आजोबांचे ऐश्वर्य. मात्र त्यांची आवडती बैलजोडी चोरीला गेली. ती शोधण्यासाठी बाहेर पडलेले आजोबा पुन्हा घरी आलेच नाहीत. मुलाने पोलिसांत तक्रार दिली. ठिकठिकाणी ते हरविल्याचे पोस्टरही लावले. रेल्वेने चिरडलेल्या लोकांचे मृतदेहही पाहिले.
मात्र वडिलांचा कुठेच पत्ता लागला नाही. आणि अचानक एक दिवस पोलीस घरी आले. त्यांनी बाबा किनारा वृद्धाश्रमात असल्याचे सांगितले. यामुळे आमच्या आनंदाला पारावार उरला नाही, असे सांगताता आजोबांच्या मुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. वर्षभर पुलाखाली भिकाऱ्याचे जीवन जगणारे आजोबा आज ऐटीत मोटारीत बसून घरी चालले होते. यामुळे वृद्धाश्रमातील इतर आजी-आजोबांनाही त्यांच्या नशिबाचा आणि बैलांवरील प्रेमाचा हेवा वाटला.