ममता बॅनर्जी यांनी दिले आव्हान
कोलकाता, दि. 19 – नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित देशव्यापी “एनआरसी’संदर्भात संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे. या व्यापक जनमतामध्ये अपयश आल्यास केंद्रातील मोदी सरकारला सत्ता सोडावी लागेल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. भाजपकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनाला हिंदु विरुद्ध मुस्लिम संघर्षाचे चित्र दिले जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी राणी रश्मोनी ऍव्हेन्यू येथे मोर्चाला संबोधित करताना केला.
“भाजपला बहुमत मिळाल्यामुळे ते पाहिजे ते करू शकतात असे होणार नाही. जर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी या मुद्दयावर संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीनुसार सार्वमत घ्यावे. सार्वमत घेणारी संस्था संयुक्त राष्ट्र संघ किंवा मानवी हक्क आयोग यासारखी निःपक्षपाती असू द्यावी आणि जर सार्वमतामध्ये सरकारचा पराभव झाला तर त्यांनी सरकारमधून पायउतार व्हावे, असे त्या म्हणाल्या.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि “एनआरसी’च्या मुद्दयावरून ममता बॅनर्जी यांनी सोमवारपासून तीन मोर्चे काढले आहेत.
हे आंदोलन म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम असल्याचे भाजपकडून दाखवले जात आहे. एका विशिष्ट समुदायाची बदनामी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी गोल टोप्या विकत घेतल्या जात आहेत. मालमत्तेची तोडफोड करताना या टोप्या भाजपचे कार्यकर्ते घालतात, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती आणि “एनआरसी’ला पश्चिम बंगालमध्ये लागू केले जाणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
भाजप म्हणजे वॉशिंग मशिन…
भाजपची स्थापना 1980 पासून झाली. पण लोकांकडून 1970 पासूनच्या नागरिकत्वाच्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. आमचा जन्म इथे झाला आहे, हीच आमची सर्वात मोठी ओळख आहे. आमच्या नागरिकत्वाची ओळख पडताळण्याचा भाजपला काही अधिकारच नाही. भाजपच्या नावाच्या तावीजाची आम्हाला आवश्यकता नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. भाजप म्हणजे भ्रष्ट आणि गुन्हेगारांना पवित्र बनवणारे “वॉशिंग मशिन’ असल्याची टीकाही त्यांनी केली.