उंडवडी सुपे येथे महामार्गावरील घटना ः सुदैवाने जीवितहानी टळली
वासुंदे- पाटस-बारामती महामार्गावर उंडवडी-सुपे येथील हॉटेलसमोर भरधाव असलेला मालट्रक जानाई मळा हद्दीत अचानक पेटला. ही घटना आज (दि. 29) पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितत हानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माल ट्रक (क्र. एमपी 09, एचएच 7851) हा आज (दि. 29) पहाटे पावणेपाचच्या दरम्यान पाटसकडून बारामतीकडे निघाला होता. यावेळी भरधाव जात असताना उंडवडी सुपे गावच्या हद्दीत जानाई मळा येथे आल्यानंतर अचानक ट्रक पेटला. या ट्रकमध्ये कापूस भरला असावा, असा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ट्रक पेटल्याचे रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली वाहने थांबवून, संबंधित ट्रक चालकाला इशारे करून सांगितले. ट्रक बाजूला घेताना बाभळीच्या झाडावर गेल्याने गाडीबरोबर झाडही जळून खाक झाले. (ट्रक चालकाचे नाव-पत्ता समजू शकले नाही), त्यामुळे ट्रक चालकाने प्रंसग अवधान राखून गाडी थांबवून गाडीतून बाहेर पडून आपला जीव वाचविला.
या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सुपे पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळावर पोहोचले. ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी बारामती एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर बारामती नगरपालिकेची आणखी एक अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. या घटनेनंतर सुमारे दीड तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रकची आग विझल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. गाडी पेटल्याची माहिती येथील नागरीक शरद तावरे यांनी पोलीस पाटिलांना दिली .