- दिलासादायक; शहरातील 12 पैकी तिघांचे अहवाल निगेटीव्ह
- सहा दिवसांत एकही पॉझिटिव्ह नाही
- 14 दिवसांनंतरचे अहवाल प्राप्त
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात आढळलेल्या करोना बाधित तीन रुग्णांनी करोनाला हरविण्यात यश मिळविले आहे. 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविलेले या तिघांचे अहवाल निगेटीव्ह आले असून दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेले अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होणार आहेत. हे अहवालही निगेटीव्ह येतील, असा विश्वास वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला असून पंधरा दिवसानंतर दिलासादायक वृत्त आले आहे. दुसरे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्यानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. उर्वरित 9 रुग्णांचीही प्रकृती स्थिर आहे. गेल्या सात दिवसांत शहरात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही.
पिंपरी चिंचवड शहरात 12 मार्च रोजी सुरुवातीलाच तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. परदेशवारी करून आल्यानंतर त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली होती. या तिघांनाही करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. या तिघानंतर अवघ्या आठवडाभरातच आणखी 9 रुग्ण आढळल्याने शहरातील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत तो 12वर पोहोचला होता. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष पिंपरी चिंचवड शहराकडे लागले होते.
मात्र त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभावी उपाययोजना करत करोना या आजाराला रोखण्यात यश मिळवले आहे. गेल्या सात दिवसांपासून शहरामध्ये एकाही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही. पहिल्या पॉझिटिव्ह तीन रुग्णांचे 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासाणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नियमानुसार गुरुवारी दुसऱ्यांदा या तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीतही त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यास हे रुग्ण करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
करोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 10 संशयितांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांनाही घरी सोडण्यात आले आहे. तर, करोना बाधित असलेल्या 12 जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील सहा दिवसांपासून शहरात करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.
“होम क्वारंटाई’ची संख्या 1276 वर
परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 276 नागरिकांना “होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. तर, महापालिकेने आजपर्यंत चार लाख 22 हजार 794 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, शहरात बाधित रुग्णांचा आकडा 12 वर स्थिर आहे. आज (बुधवारी)दोन संशयीतांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. पाच नविन संशियांना आज (बुधवारी) नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
“होम क्वारंटाईन’ केलेल्या नागरिकांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. सूचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील 14 दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.