निर्मला सीतारामन यांची कबुली
मुंबई : जीएसटी करवसुलीत घट झाल्यामुळे राज्यांना द्यायच्या जीएसटी नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यास विलंब झाला असल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. आज येथे इकॉनामिक कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही राज्यांना ही रक्कम देणे लागतो त्याचा आम्ही इन्कार केलेला नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यापासूनची थकबाकी केंद्र सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यांचे केंद्राकडे 50 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकचे येण थकले आहे. त्यासाठी राज्य सरकारांकडून सारखा तगादा लावला गेला आहे.
या संबंधात अधिक भाष्य करताना त्या म्हणाल्या की हे पेमेंट थकले आहे हे मला मान्य आहे. दर दोन महिन्याच्या लॉटने हे पेमेंट दिले जाते, ही रक्कम देण्याविषयी आम्ही इन्कार केलेला नाही असेही त्या म्हणाल्या. इंडियन इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंग मध्ये त्या बोलत होत्या.
जीएसटी थकबाकीमुळे राज्यांनी नाउमेद होण्याची गरज नाही हा त्यांचा दोष नाही किंवा माझाही व्यक्तीगत दोष नाही. जीएसटीचे कलेक्शनच अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाले आहे त्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी मान्य केले. नैसर्गिक आपत्तीमुळे देशाच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे जीएसटी कलेक्शन घटल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
खरेदी मंदावल्यामुळेही हे कलेक्शन घटल्याचे त्यांनी मान्य केले. जीएसटी कर कपात करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.