नारायणगाव – येथून जुन्नरकडे जात असलेल्या टेम्पोमध्ये कत्तल करण्यासाठी घेऊन चाललेल्या जर्सी जातीच्या तीन गायींना गोरक्षकांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले. याप्रकरणी जुन्नर येथील दोघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम अब्दुल सलाम सौदागर (वय 31) व अब्दुल मुतलिफ अब्दुल समर कुरेशी (वय 29, दोघे रा. खलीलपुरा, खालचा माळीवाडा, जुन्नर) अशी या आरोपींची नावे आहेत. महेश रमेश गाढवे (वय 34, रा. आर्वी केंद्र, नारायणगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पिंपळगाव फाटा येथे एका पेट्रोल पंपाजवळ गोरक्षक महेश रमेश गाढवे, पिंपळगावचे सरपंच सोन्या गावडे, सचिन चव्हाण, राजन वऱ्हाडी हे कामानिमित्त बोलत उभे असताना पंपावर अशोक लेलॅंड कंपनीचा दोस्त टेम्पो (एमएच 16 एवाय 1576) डिझेल भरण्यासाठी आला असता महेश गाढवे यांना त्या गाडीत जनावरांचा जोराने चुळबुळ होत असल्याचा आवाज आला. टेम्पोच्या पाठीमागील बाजूस पाहणी केली असता त्यामध्ये तीन जर्सी गायीचे निर्दयतेने तोंडाला चिकटपट्टीने घट्ट बांधून त्यांची चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना नारायणगावहून जुन्नर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असताना सांगितले. त्यामुळे गाढवे व सहकाऱ्यांनी नारायणगाव पोलिसांशी संपर्क साधून टेम्पो व जनावरे पोलिसांच्या ताब्यात दिली. पुढील तपास पोलीस नाईक काका जांभळे करीत आहेत.