तहसीलदारांचे लेखी पत्र : अशोक पवार यांचे उपोषण मागे
शिरूर- औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा कमी करावा, यासाठी तुमच्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पुणे यांना अहवाल सादर केला आहे. लवकरच औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा कमी करण्यासाठी निर्णय होईल, याचा निर्णय दोन दिवसांत तुम्हाला कळवू, असे लेखी आश्वासन शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी माजी आमदार ऍड. अशोक पवार यांना लेखी दिल्यानंतर अखेर माजी आमदार अशोक पवार यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले. यावेळी तहसीलदार बिराजदार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी लिंबू पाणी दिले. यानंतर पवार यांचे उपोषण मागे घेतले. शिरूर तालुक्यातील घोड धरणातील पाणी कमी होत चालले आहे.
रांजणगाव गणपती एमआयडीसीचा एक्स्प्रेस फिडर चौवीस तास पाणी उपसा औद्योगिक कारणांकरिता करीत आहे. पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक कारणासाठीचे पाणी बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. अशोक पवार बुधवारपासून शिरूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यावेळी पंचायत समिती सभापती विश्वास कोहोकडे, जिल्हा परिषदेचा कृषि समितीच्या सभापती सुजाता पवार, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, शहराध्यक्ष नगरसेवक मुझ्झ्फर कुरेशी, ऍड. रवींद्र खांडरे, प्रा. सुभाष कळसकर, बाबासाहेब फराटे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.