तलाव, विहरी, कूपनलिका कोरड्या ः गावांत टॅंकरने पाणीपुरवठा
कुरकुंभ- राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असली तरी दौंड तालुक्यातील जिरायती भागात अद्यापही दुष्काळ आहे. कुरकुंभ (ता. दौंड) तसेच आजूबाजूच्या पांढरेवाडी, जिरेगाव, कौठडी या परिसरातील नागरिकांना पाऊस नसल्याने दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. या भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने विहिरी, कूपनलिका,कोरड्या पडल्या आहेत.
धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने भीमा नदी आणि खडकवासला कालव्यात पूर्ण क्षमतेने पाणी वाहत आहे. मात्र, दौंड तालुक्यातील जिरायती भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जिरेगावामध्ये ऐन पावसाळ्यात गावातील लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. येथील नागरिकांच्या माथी बाराही महिने दुष्काळच आहे. गावात टॅंकर येताच वयोवृद्धांची देखील पाणी मिळविण्यासाठी पळापळ होते आहे.
येथील तलाव ऐन पावसाळ्यात कोरडा पडलेला असल्याने वन्यजीवांचे ऐन पावसाळ्यात पाण्यावाचून हाल होत आहेत. शेतकऱ्यांना चारा व जनावरांच्या पिण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जिरेगाव परिसरात पाऊस कमी झाल्याने जानाई-शिरसाई योजनेतून कायम स्वरूपी पाणीपुरवठा करून येथील पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत असली, तरी शेतकऱ्यांच्या नशिबी कायम निराशाच आहे. जनाई-शिरसाई उपसा योजनेंतर्गत जिरेगाव तलावात पाणी सोडले तर गावातील पिण्याच्या पाण्याबरोबर या भागात खरीप हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
- गुरुवार (दि. 8) पासून जनाई-शिरसाई उपसा योजनेतून दौंड तालुक्यातील जिरायती भागातील तलावात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या वासुंदेमधील तलाव पूर्ण भरल्यानंतर जिरेगावमधील तलाव भरण्यात येईल.
– पी. डी. धुमाळ, शाखा अभियंता, जानाई-शिरसाई उपसा योजना, दौंड