मलठणच्या महिलेची यशोगाथा
सुंदराबाई सांडभोर यांचा शिरूर तालुक्यात आदर्श
फळबागेत आंतरपीक, पूरक व्यवसायाची जोड
सविंदणे – ऐन भीषण दुष्काळी परिस्थिती, पिण्यासाठीही पाणी नाही. सभोवताली दुष्काळामुळे संपूर्ण चोहोबाजूने उजाड परिसर गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून टॅंकर सुरू आहे. या प्रतिकूल परिस्थितीत दुष्काळावर मात करीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुंदरबाई सांडभोर यांनी फळबागेद्वारे लाखों रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दुष्काळात तग धरता येता येते, याचा समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
सुंदरबाई सांडभोर यांनी 10 वर्षापूर्वी पती बाळासाहेब व मुलगा ऋषिकेश, मुकेश यांच्या मदतीने 5 एकर जमिनीमध्ये लिंब, आंबा, शेवगा, सीताफळ फळझाडांची लागवड केली होती. दोन वर्षांपासून परिसरात दमदार पाऊस न पडल्यामुळे लाखेवाडी परिसरात विहिरी कोरड्या पडल्या होत्या. त्यामुळे सुंदरबाई यांनी मलठणजवळील कालव्यावरून साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून शेताला पाणी आणले. हे पाणी शेतामध्ये केलेल्या चाळीस लाख लिटरच्या शेततळ्यात सोडले. ठिबकद्वारे फळबागा जगवण्याचा प्रयत्न केला. वेळप्रसंगी टॅंकरद्वारे फळबागांना पाणी घालण्यात आले.
सुंदरबाई सांडभोर यांनी स्वतः ही फळे तोडून मलठण, टाकळी हाजी, कवठे येमाई, कान्हूर मेसाई गावातील आठवडे बाजारांमध्ये दलाल व व्यापाऱ्यांची मदत न घेता स्वतः त्यांनी विकला. फेब्रुवारी ते मेअखेरपर्यंत त्यांनी तीन लाखांची लिंबू विकली आहेत. त्यांनी फळबागांमध्ये आंतरपीक घेऊन वर्षाकाठी दोन लाखांचा निव्वळ नफा कमावला आहे.
शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन, शेतामध्ये बंदिस्त गोपालन, कुक्कुट, ससेपालनही त्या करीत आहेत. मुख्य पिकांना पूरक उद्योगांची जोड देत असून त्यांना घरच्यांची लाखमोलाची साथ लाभली आहे. पती बाळासाहेब हे महावितरण कंपनीमध्ये लाईनमन म्हणून कामाला होते. ते निवृत्त झाल्यानंतर तेही पत्नीला कामामध्ये मदत करीत आहेत. मुलगा ऋषिकेश हा पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेमध्ये इलक्ट्रिशियन म्हणून काम करीत आहे. तोही आईला शनिवार व रविवारी मदत करीत आहे. दुसरा मुलगा मुकुंद हा लष्करात आहे. तो गावाकडे सुट्टीला आल्यावर आईला मदत करतो.
टॅंकरच्या पाण्यावर जगवली फळबाग
दुष्काळी परिस्थितीत शेततळे व टॅंकरद्वारे पाण्याच्या संकटावर मात करून लिंबाची फळबाग जगवल्यामुळे झाडांना चांगली फळे आली आहेत. कडक उन्हामुळे व लिंबाची कमी आवक असल्यामुळे लिंबांना मागणी आहे. आठवडे बाजारामध्ये लिंबांना 150 ते 200 रुपये शेकडा भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबामधून उत्पन्न मिळत आहे. मला शेती करण्याची खूप आवड आहे. चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे मी अतिशय आनंदी आहे. स्वतःचा रोजगार उपलब्ध केला असून इतरांनी चांगल्या प्रकारची फळझाडे लावून रोजगाराच्या वाटा मिळविल्या पाहिजेत.