सातारा, दि. 20 (प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस दलात व कार्यक्षेत्रात भानगडबाज अधिकारी म्हणून परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याची त्यांच्या कामाचा अनुभव व पध्दत पाहून नुकतीच पोलीस अधीक्षकांनी मुख्यालयात बदली केली आहे. त्यामुळे सैरभर झालेल्या त्या अधिकाऱ्याने बदलीच्या आदेशाल खो घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी संबंधित अधिकारी एका राज्य मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने तथाकथित अन्यायकारक बदलीचा पाढा वाचून एसपींच्या कागाळ्या सुरू केल्या. आधीच कामात असलेल्या मंत्री महोदयांनी “”तुम्ही तुमचे सांगा बाकी कोण काय करतो ते नका सांगू” असे म्हणत जाळ अन् धूर काढल्याची चर्चा आहे.
त्याचे झाले असे की, जिल्हा पोलीस दलात सध्या एक अधिकारी कार्यक्षमता, निर्णयक्षमता, देण्या-घेण्याच्या भानगडींनी भलतेच चर्चेत आहेत. त्यांना वरिष्ठ पातळीवरून वेळोवेळी सुचना दिल्यानंतर त्यांच्यात बदल होण्याची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा येरळा नदीच्या पात्रात बुडाल्याने त्यांच्याबाबत अनेकदा तक्रारींचा पाऊस पडला होता.
त्यामुळे काही महिन्याआंधी त्यांची बदली करण्यात आली होती. परंतू बदली आदेशाला त्यांनी मॅट कोर्टात आव्हान दिले होते. त्यात न्याय त्यांच्या बाजूने झाल्याने संबंधिताच्या बाहूत बारा हत्तीचे बळ आल्याचे नंतरच्या वागण्यातून दिसून आले. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी त्यांच्या भानगडी वाढल्या. परिणामी त्यांच्याविरोधात नऊ कसूरी अहवाल तयार झाल्याने त्यांना खुलासा मागवण्यात आला व कायदा सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी त्यांची बदली साताऱ्याला करण्यात आली.
परंतू वाळू, दारू, मटका,किरकोळ तोडींच्या पिंजऱ्यात संबंधितांचा पोपट अडकल्याने त्यांचा पाय काही केल्या कार्यक्षेत्रातून निघेना. त्यामुळेच त्यांनी एका पदाधिकऱ्याच्या माध्यमातून शनिवारी मंत्री महोदयांच्या दरबारात हजेरी लावली. मंत्र्यांची सगळी कामे झाल्यानंतर त्यांनी जाता-जाता यांना भेट दिल्यावर संबंधित अधिकाऱ्याने त्याच्यावर झालेल्या तथाकथित अन्यायाचा पाढा वाचला.
त्यावर न थांबता खुद्द पोलीस अधीक्षकांचीच कागाळी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे भडकलेल्या मंत्री महोदयांनी “”तुम्ही तुमचे सांगा बाकी कोण काय करतो ते नका सांगू” असे म्हणत जाळ अन् धूर काढल्याची चर्चा आहे.