मुंबई : राज्यातील आगामी सणवाराचा विचार करून एसटी महामंडळाने आपल्या तिकिट दरात मोठी दरवाढ केली आहे. राज्यभरातील प्रत्येक विभागातील एसटी बसमधून प्रवास करताना सामान भाड्यासाठी पाचपटीने तिकीट आकारणी करण्यात येणार आहे. 27 ऑगस्टपासून सामानाच्या तिकिटाचे किमान भाडे पाच रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत किमीनुसार आकारण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाने 20 किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. मात्र याची अंमलबजावणी ही आता येत्या 27 ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यानश हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगारांमध्ये पाठविण्यात आला आहे. सामानाच्या भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांच्या माहितीसाठी प्रत्येक आगारातील फलकावर लावण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. एसटी महामंडळाने जून 2019 मध्ये प्रवासी भाड्यात वाढ केली होती. त्यानंतर आता प्रवाशांच्या सामानाची भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडणार असल्याचे चित्र दिसत आहे.