प्रभातचा पाठपुरावा : ग्रामपंचायत खडबडून जागे
उरुळी कांचन- उरुळी कांचन येथील बाजारात मोठ्या प्रमाणात चिखल साचला जात असल्याने रोगराई पसरली जात आहे. याबाबतचे सडेतोड वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. ग्रामपंचायतीच्या वतीने आज बाजार परिसरात मुरूम टाकण्यात आले. बाजारातील व्यापाऱ्यांना बसण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.
उरुळी कांचन येथे दर रविवारी तसेच दररोज संध्याकाळी चार वाजता बाजार भरतो. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने व्यापारी त्रस्त झाले होते. त्यात रोगराई निर्माण झाली होती. अनेक जण बाजारात जात नव्हते. बाजारात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने आर्थिक उलाढाल मंदावली होती. याबाबत प्रभातने निर्भीडपणे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल ग्रामपंचायतीने तात्काळ घेतली. सरपंच राजेश्री वनारसे, उपसरपंच सागर कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी तातडीने दखल घेऊन बाजार परिसरात मुरूम टाकण्यात आला.