- करोनाची धास्ती ः शहरातील रस्ते सुनेसुने
पिंपळे गुरव – करोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरले आहे. त्याला अपवाद औद्योगिकनगरीदेखील नाही. महाराष्ट्रात सर्वांत जास्त करोनाबाधितांची संख्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. ही संख्या आज घडीला दहा वर आहे. परंतु त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहे. वेगवेगळे निर्णय घेत आहे. नागरिकांना सतर्कता घेण्याचे आवाहन करत आहे. याच भूमिकेतून उपनगरांमध्ये उद्योगधंद्यासाठी तसेच नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील वेगवेगळी शहरे, खेड्यापाड्यांतून लोक आले आहेत. त्यांनी आता गावाचा रस्ता धरण्यास सुरुवात केल्याने उपनगरे रिकामी होताना दिसत आहेत.
महाराष्ट्र शासनाने शाळा, कॉलेज, सिनेमागृह, रेल्वे, जमावबंदी, मॉल, प्रार्थनास्थळे बंद केल्याने सध्या शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. तसेच व्यापारी संघटनांनी स्वयं घोषित बंद पुकारल्याने बाजारपेठांमध्येही नागरिकांची रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे करोना व्हायरस रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सरकार करत आहे त्याला नागरिकांकडूनदेखील मोठ्या प्रमाणावर सकारत्क प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते, चौक कायम गर्दीने तुडुंब भरलेले दिसत होत ते आता रिकामे झालेले पाहण्यास मिळत आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्या मिळाल्याने उपनगरांमध्ये राहणारे बरेच नागरिक हे महाराष्ट्रातील विविध शहरांमधून पिंपरी-चिंचवड शहरात उपजीविका करण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी आपल्या मुलाबाळांना, बायकोला गावाकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील बरीच लोकसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील यंत्रणेवरील व वाहतूक कोंडीवरील, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे उपनगरांत दुपारी व अनावश्यक फेरफटका मारणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
सांगवीतील साई चौक परिसर नेहमी गजबजलेला रात्री, दिवसा कधीही आपण गेलो तरी गर्दी असतेच. परंतु आज याठिकाणी गर्दी नव्हती. चौकातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्याने गर्दी एकदम कमी झाली. चौकातील हॉटेल, रिक्षा, खानावळ, विविध चहाचे स्टॉल तसेच चाट कॉर्नर, स्नॅक्स सेंटर, फेरीवाले यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. त्यामुळे चौकात शुकशुकाट दिसून येत आहे.
अशीच परिस्थिती नवी सांगवी ती कृष्णा चौक परिसर, जुनी सांगवीतील ढोरे रस्ता, अहिल्याबाई होळकर चौक, गजानन महाराज मंदिर, आदी महत्त्वाच्या ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. सांगवीतील माहेश्वरी चौकातून पुणे, पिंपरी चिंचवड औंध अशी वाहनांची वाहतूक नेहमी असते. पण सध्या करोनाने धास्तावले लोक दिसत आहेत त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पीएमपीच्या फेऱ्यादेखील कमी केल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी दिसून येत नाही.
अशीच परिस्थिती पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरात आहे. येथे नेहमी शाळकरी मुले व वाहने व भाजी विक्रेते यांनी गजबजलेला रस्ता मात्र आता सुनासुना दिसत आहे. पिंपळे गुरव येथील शेवटचा बस थांबा कायम गर्दीने फुललेला परंतु करोनाच्या धास्तीने आणि नागरिकांच्या स्थलांतरामुळे येथेदेखील गर्दी कमी झाली आहे. दापोडीतील नरवीर तानाजी मालुसरे पुतळा परिसरातही अशीच स्थिती आहे. आंबेडकर पुतळा. शिवाजी महाराज चौक येथे कायम वाहतूक कोंडीचा प्रश्न असतो. परंतु आता हे रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडताना दिसत नाहीत.