नायगाव- पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत कायमच दुष्काळी परिस्थिती असायची. उन्हाळा सुरु झाला की लगेचच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक टॅंकरची मागणी करायचे; परंतु उदाचीवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात पाण्याची योजना राबविली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तरीही शेतीसाठी पाणी कुठून आणायचे? हा प्रश्न वर्षानुवर्षे भेडसावत आहे. त्यातच मागील चार वर्षांपासून पुरंदर तालुक्यासह संपूर्ण राज्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. त्याचबरोबर मानसंधारणाची कामेही केली जात आहेत.
जलसंधारणाच्या कामांमध्ये मुले मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सर्वांनी हातात टिकाव, फावडे घेवून कामाला सुरुवात केली. मागील वर्षापासून इयत्ता पहिलीपासून सर्वच वयोगटातील शालेय मुलांनी या मोहिमेत सहभाग घेवून काम करण्याचा निर्णय घेतला. ज्याला जसे जमेल तसे श्रम करण्यास प्रारंभ केला. कोणी टिकावाने खड्डे खणले, कोणी माती काढली, तर लहान चिमुकल्यांनी काम करणाऱ्या व्यक्तींना पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा, जेवण पुरविण्यासाठी मदत केली. या लहान वानरसेनेचा हुरूप पाहून ग्रामस्थ भारावले आणि त्यांनीही श्रमदान करण्यास सुरुवात केली.
या माध्यमातून अनेक सीसीटी चर, बंधारे, शेततळी, वृक्षारोपण खड्डे, प्रत्येक घरोघरी शोष खड्डे, कचरा व्यवस्थापन अशी अनेक मोठी कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे लाखो लिटर पाणी साठवण क्षमता वाढली आहे. आजही अनेक कंपन्यांची कामगार, कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक संस्था येऊन काम करून ग्रामस्थांच्या एकजुटीला बळ देत आहेत. यावर्षी 500 खड्डे घेण्यात आले असून 800 झाडे रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. उदाचीवाडी येथे वरील कामे झालेली असून अजुनही बरीच कामे करण्यात येणार आहेत.