परतलेल्या 236 जणांमध्ये 131 विद्यार्थ्यांचा समावेश
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यातच इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचे होते. मायदेशी परतता येईल की नाही ही चिंता त्यांना लागून राहिली होती. मात्र ही चिंता आता संपली आहे. कारण कोरोनाच्या दहशतीत जगणाऱ्या 236 भारतीयांना मायेदशी आणण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच या 236 जणांमध्ये 131 विद्यार्थी आहेत असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी 44 प्रवाशांना इराणहून भारतात आणले गेले. त्यानंतर आतापर्यंत एकूण 236 भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आले आहे. यासाठी जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत. इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे 100 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे.
जगभरात सुमारे दीड लाखापेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त आहेत. तर इराणमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठी आहे. इराणमध्ये 13 हजारपेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे या ठिकाणी गेलेले भारतीय विद्यार्थी आणि यात्रेकरू हे मायदेशी परतता येईल की नाही? या चिंतेत होते. मात्र त्यांची चिंता आता मिटली आहे. त्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. भारतात आलेल्या 236 जणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.