- महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : भाविकांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी – पवित्र इंद्रायणी नदी आता गटार गंगा बनत आहे. शहरातील उपनगरांतून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व मैलामिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच काही ठिकाणी सांडपाणी वाहिनी फुटल्याने पाणी थेट नदीत मिसळत असल्याने जलप्रदूषण होते. त्यामुळे जलचराचे व स्थानिक नागरिक, तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चिखली, कुदळवाडी व आजूबाजूच्या परिसरातील सोनवणे वस्ती, पाटीलनगर, केशव नगर, मोरे वस्ती तसेच वाड्या वस्त्यांमधील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी नदीपात्रात मिसळत असल्याने नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आळंदी-देहू मार्गावर मोई चौकात सांडपाणी वाहून नेहणाऱ्या ओढ्यातील ड्रेनेज लाइन फुटल्याने मैलामिश्रित पाणी थेट ओढ्याद्वारे इंद्रायणी नदीत जात आहे. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मैलामिश्रित पाणी नदीत सोडल्याने जलपर्णीत वाढ होत आहे. त्यामुळे जलप्रदूषणाबरोबरच दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर येते. काठावरील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नदी पात्र स्वच्छ नसल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते. परिणामी नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
रसायनमिश्रित पाणी थेट नदी पात्रात
कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकाने आहेत. येथे जुन्या गाड्या, भंगार वस्तू यांचा संचय केला जातो. त्याच्यावर पाणी मारल्याने अथवा काही जुनी वाहने धुतल्याने ते पाणी थेट कोणतीही प्रक्रिया न करता नाल्याद्वारे इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीतील जलचर सृष्टी धोक्यात आली आहे. तसेच जलप्रदूषण होत आहे. या सर्व गोष्टींकडे महापालिका प्रशासन मात्र डोळेझाक करताना दिसत आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.
नदीपात्रात धुतली जातात वाहने
चिखली येथे नदी पात्रात वाहनचालक वाहने धुतात. त्यामुळे वाहनाचे ग्रेस, ऑइल, वाहने धुण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर यामुळे रसायनमिश्रित पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. नदीपात्रात वाहने धुण्यास बंदी असतानादेखील येथे सर्रास वाहने धुतली जातात. मात्र, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे जलप्रदूषण होत आहे.
भाविकांचे आरोग्य धोक्यात
भारतात नद्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना माते समान दर्जा आहे. नदीला भारतीय संस्कृतीत खूप पवित्र मानले गेले आहे. त्यामुळे जवळपास सर्व तीर्थक्षेत्र नदी किनारी वसली आहेत. भारतात गंगा नदीला जसे महत्त्व आहे तसेच भीमा, इंद्रायणी नदीला देखील महत्त्व आहे. या नदी तीरावर देहू आणि आळंदी ही दोन तीर्थक्षेत्रे वसली आहेत. महाराष्ट्रातून व भारतातून येथे भाविक, अभ्यासक येत असतात. नदीच्या घाटावर जाऊन तीर्थस्नान करून मंदिरात दर्शन घेण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने नदीत डुबकी मारून दर्शनासाठी जातात. परंतु अशा दूषित पाण्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीतील पाणी हे पवित्र तीर्थ म्हणून पिले जाते, परंतु याच पाण्यात शहरातील सांडपाणी, मैलामिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. हे एक प्रकारे भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. तरीदेखील महापालिका प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. भाविकांना एकप्रकारे वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. भारतात गंगा नदी प्रदूषणरहित करण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु महाराष्ट्रात अशी यंत्रणा काम करताना दिसत नाही. तेव्हा त्वरित सांडपाणी, मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडणे बंध करून ते शुद्ध करूनच नदीत सोडावे, अशी मागणी तीर्थक्षेत्रातील भाविकांकडून होत आहे.
कामगारांना सहन करावा लागतोय दुर्गंधीचा त्रास
आळंदी-देहू रोडवर मोई चौकात पुलावर भल्या पाहटेपासून पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपली उपजीविका भागविण्यासाठी कामाच्या प्रतीक्षेत उभे असतात. शहरात उच्चभ्रू नागरिक मॉर्निंगऑकसाठी जातात ती स्वच्छ हवा मिळावी, आरोग्य चांगले राहवे यासाठी, परंतु ज्यांच्यापुढे पोटाचा प्रश्न आवासून उभा आहे. सकाळी सकाळी रस्त्यावर येऊन उभा राहिले तर याठिकाणी चिखली आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमधून येणारे सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी येथून थेट इंद्रायणी नदीत जाते. त्यामुळे या ठिकाणी कामगारांना दुर्गंधीयुक्त उग्र वास सहन करत कोणी काम देतं का काम या प्रतीक्षेत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना नाविलाजास्तव येथे उभा राहवे लागत आहे. या पाण्यामुळे कामगारांच्या आरोग्याबरोबरच इंद्रायणीचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे.