आळंदी- संचारबंदी काळातही आळंदी पोलिसांची नजर चकूवून गावात गल्ली बोळातून मद्यपी दारूसाठी इतस्तत: फिरत आहेत. करोनाची भीती असल्याने मद्यपी कोण कुठून आला, याबाबत नागरिक साशंक आहेत. मद्यपी रस्त्यावर फिरू नये आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची बाधा इतरांना होऊ नये यासाठी दारूविक्रीबाबत ताबडतोब बंदोबस्त करा, अशी मागणी आळंदीकर करत आहेत.
आळंदी-मरकळ रस्ता, आळंदी-चाकण रोड, आळंदी वडगाव घेनंद रोड, पुणे आळंदी रोड, आळंदी देहू रोड, तसेच चाकण शिक्रापूर रोड, चावडी चौक, चाकण चौक, पद्मावती रस्ता, वडगाव रस्ता आदी ठिकाणी तिप्पट भाव घेऊन दारूची विक्री राजरोसपणे केली जात आहे. या भागात छुप्या पद्धतीने दारू विकली जाते आहे. पोलीस आले की अवैध दारू विक्री करणारे तात्पुरत्या स्वरूपात सुटका करून घेतात आणि पोलिसांची पावले वळाली की पुन्हा चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू होते.
सकाळी सहालाच मद्यपींची पावले या दारूविक्री केंद्रांकडे वळत आहेत. इंद्रायणी घाटावर अनेक मद्यपी इतस्ततः उघड्यावर फिरत आहे. हाताला रोजगार नाही; पण उधारीवरही दारू विकली जात असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम म्हणजे दारू विक्रीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आहे. संचारबंदी काळात दुचाकीवरून जाणाऱ्यास ठोकले जाते आहे, तसेच दारू विक्रीवाल्यालाही कायदा दाखवा, म्हणजे दारू विक्री होणार नाही आणि मद्यपी गावठाणात फिरणार नाहीत.