एसटी, पीएमपीची बससेवा बंद : जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास
चिंबळी- मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असलेल्या आळंदी व चाकण शहराला आजही थेट जोडणारी पीएमपीएमएल व एसटी बससेवा उपलब्ध नसून प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे जीव धोक्यात घालण्या बरोबरच खिशाला देखील झळ सोसावी लागत आहे.
काही वर्षांपूर्वी पीएमपी ने मार्केट यार्ड ते चाकण व्हाया आळंदी मार्गे बस रूट क्र.65 ही बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, आबालवृद्ध, नागरिक व भाविक यांची थेट पुणे मार्केट, आळंदी व चाकण मार्केट अशा सुरूळीत सेवेचा लाभ अनेकांना मिळत होता. मात्र, 2008मध्ये आळंदी – चाकण घाटात रात्री साडेआठच्या सुमारास काही समाजकंटकांनी ही बस लुटण्याचा प्रयत्न केला व त्यावेळेस रस्ते अतिशय खराब असल्याचे कारण पुढे करीत सुरूळीत सुरू असलेली व अधिकचा नफा मिळवून देणारी बससेवा तत्कालीन अधिकाऱ्यांनी रद्द केली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या मार्गावर बससेवा नसल्याने नियमित हजारो प्रवासी व भाविकांना खासगी वाहनांतून जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनांतून प्रवास म्हणजे हम करोसो कायदा आडवुन जादा पैसे घेणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी भरणे या खासगी वाहन चालकांच्या त्रासाला प्रवासी, भाविक, नागरिक अक्षरशः वैतागले आहेत.त्यामुळे या मार्गावर पुर्ववत 65 नंबरची मार्केट यार्ड ते चाकण व्हाया आळंदी मार्गे बस पुन्हा सुरू करावी किंवा फक्त आळंदी ते चाकण बससेवा सुरू व्हावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
- आळंदी ते चिंबळी मार्गे चाकण बस हवी
आळंदी, केळगाव, चिंबळी, कुरुळी फाटा आदी भागात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. केळगाव व चिंबळीतील नागरिकांना गावातून मुख्य रस्त्याला येण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. शिवाय चाकणचा जाण्यासाठी बस पकडण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर चालत जावे लागते, यामुळे या मार्गावर देखील बस सुरू करावी अशी मागणी होत आहे. तसेच तीन सप्टेंबर रोजी राजगुरूनगर ते पुणे स्टेशन मार्ग क्रं. 357 बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी ही प्रवासी वर्गानी केली आहे