चाकण – लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आणि राज्यातील अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. 29) पार पडले. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील चाकण शहरामध्ये देखील स्थानिक नागरिकांनी मतदानचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी श्री शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रात आकर्षक सजावटीच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले होते. तर या मतदान केंद्रावरील सेल्फी पॉंईंट आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरले. येथे नवमतदारासंह जवळपास सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यावर “आम्ही मतदान केले, तुम्ही केले का? असे म्हणत सेल्फी ाढले.
आपल्या देशातील लोकशाहीमध्ये मतदान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हेच कर्तव्य बजावत असताना चाकण शहरामधील मतदान केंद्रांमध्ये केलेली सजावट मतदारांना थक्क करणारी होती. एवढेच नाही तर या ठिकाणी मतदानाला येणाऱ्या वृद्ध, अपंग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर आकर्षक सजावटीचे एक प्रवेशद्वार उभे करण्यात आले होते.
रंगबेरंगी छत्र्या लावण्यात आल्या होत्या. याचबरोबर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे मन प्रसन्न करणारी सुंदर रांगोळी रेखाटून स्वागतही करण्यात आले. सकाळी सुरुवातीला पहिल्या 51 मतदान करणाऱ्या मतदारांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. तसेच उन्हाच्या कडाक्यामध्ये तरुण, वयोवृद्ध मतदारराजा असे नागरिक या ठिकाणी मतदानाला येऊन मतदान करत असताना “मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो’, “आपले मत आपली ताकद’.. “देश आपला आपण देशाचे सिद्ध करू सज्ञान’ असल्याचे असे विविध संदेश या ठिकाणी देण्यात आले. तसेच येथे येणाऱ्या मतदारांसाठी आकर्षक असा सेल्फी पॉंईंटही तयार करण्यात आला आहे.