लोणी काळभोर- जीवशास्त्र हे नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारे शास्त्र आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व शाखांमध्ये जीवशास्त्र विज्ञान हा विषय अनिवार्य करावा. त्याला गणिताची जोड द्यावी, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबईचे कुलगुरू पद्मश्री. प्रा. डॉ. गणपती यादव यांनी व्यक्त केले. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा, एमआयटी स्कूल ऑफ कॉर्पोरेट इनोव्हेश व लीडरशीप आणि एमआयटी स्कूल ऑफ ह्युमानिटीस्च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नॅकचे सह सल्लागार डॉ. देवेंद्र कवडे, प्रा. पी. बी. जोशी, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, मिटकॉमच्या संचालिका सुनीता कराड, प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, डॉ. जब्बार पटेल, कुलसचिव शिवशरण माळी, रामचंद्र पुजेरी, सचिव आदिनाथ मंगेशकर, अधिष्ठाता अनंत चक्रदेव उपस्थित होते.
डॉ. यादव म्हणाले, जगात भारताच्या नावावर खूप कमी संशोधनाचे पेटेंट आहेत. जपान, अमेरिका यासारख्या अन्य देशांचा यात अग्रक्रम लागतो. तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होते आहे. आजची युवा पिढी तंत्रज्ञानाच्या व गुगल सर्चच्या आधिन होत आहे. परिणामी नवनिर्मितीच्या कल्पनांना मूठमाती मिळत आहे. प्रा. पी. बी. जोशी यांनी स्वागत केले. डॉ. सुनील राय यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्नेहा वाघटकर, प्रा. पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी आभार प्रदर्शन केले.