पुणे – महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वाहनांनी प्रवास करण्यासाठी अंध-अपंग व्यक्तींना केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) देण्यात आले आहेत. यामध्ये अपंग व्यक्तींना साध्या बस व निमआराम बसला 75 टक्के व अपंग व्यक्तींच्या मदतनीसला 50 टक्के सवलत देण्यात येते. मात्र, मदतनीसाला सवलत मिळण्यासाठी दरवेळेस आगारप्रमुखांचा दाखला आणण्याची केलेल्या सक्तीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी अपंग व्यक्तींनी केली आहे.
65 टक्क्यांवरील अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना प्रवासादरम्यान मदतनीस म्हणून असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकवेळी आगार प्रमुखांचा सही व शिक्का आणल्यानंतर मदतनीसाला 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, प्रत्येक वेळेस आगारप्रमुखांची भेट होऊन शिक्का मिळेल याची खात्री नाही. तसेच, दरवेळेस अपंग व्यक्तीला खेटे मारणेही शक्य नसल्याने एस.टी. प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे.