वॉशिंग्टन – चंद्रावर भारतीय माणूस आजवर गेलेला नाही. मात्र, ऐशीच्या दशकात राकेश शर्मा यांनी अंतराळप्रवास करत पहिला भारतीय अंतराळवीर बनण्याचा मान मिळवला होता. त्याचबरोबर भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनीही अनेकदा अंतराळभ्रमण केले. कल्पना चावला यांचे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत येताना जळून भस्मसात झाले होते. त्यातच त्यांच्यासह सर्वच अंतराळवीरांचा मृत्यु ओढवला होता. सुनिता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात अनेक महिने रहिवासही केला होता.
आता अमेरिकेच्या नॅशन एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात “नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील “आर्टेमिस’ या मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अठरा जणांच्या पथकामध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे. चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. त्यांचे वडील श्रीनिवास चारी हे मूळचे हैदराबाद येथील रहिवासी होते. ते साधारण 90 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले. या चमूत निम्म्या महिला आहेत.
“आर्टेमिस चांद्र अवतरण’ मोहिमेत त्यांच्यापैकी काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे. ही मोहीम वर्ष 2024 मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणार आहे. दशया अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी वस्ती निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेत असून त्याची पहिली पायरी म्हणून 2024 मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा राबवल्या होत्या.