एकदा एका साधुसद्पुरुषाकडे तीन व्यक्ती आल्या. त्यांनी आपल्या समस्या त्यांना सांगितल्या. त्यावर उपाय विचारला. तेव्हा सद्पुरुष म्हणाले. “”अरे बाबांनो! तुमच्या तिघांच्याही वेगवेगळ्या असलेल्या तिन्ही प्रकारच्या समस्यांवर उपाय मात्र एकच आहे.”
“”काय! एकच उपाय. तो कोणता? स्वामी! तो उपाय काय आणि कोणता ते आम्हास सांगा.” त्यांनी विनंती केली. त्यावर शांतपणे सद्पुरुष म्हणाले, “”हे पाहा, तुम्ही तिघांनी पण एक गोष्ट करा तुम्ही “त’ सांभाळा.”
“”काय! “त’ सांभाळा, म्हणजे नेमकं काय करा?” त्या तिघांनी विचारले.
तेव्हा सद्पुरुष म्हणाले, “”हे पाहा, माणसाच्या जीवनाची घडी ही तीन कारणांनी बिघडत, मोडत आणि विस्कटत असते. ती कारणे म्हणजे त्याचे चित्त, वित्त आणि पित्त. म्हणून तुम्हाला हाच बोध दिला की तुम्ही “त’ सांभाळा. म्हणजे तुमच्या समस्या सुटतील. पण तुमच्या काही ते नीट लक्षात आलेले दिसत नाही, होय ना. थांबा, आता स्पष्ट करून सांगतो.
असे म्हणून सद्पुरुष पुढे म्हणाले, “”या हरीभाऊंची समस्या ही की, त्याच्या मिळकतीची आणि खर्चाची तोंडमिळवणी बरोबर होत नाही. ज्याला आपला संसार, घर हे नीट चालावं असे वाटते त्याने “वित्त’ हे नीट सांभाळायला हवे. म्हणजेच काय? तर ते योग्य मार्गाने मिळवून काटकसरीने हात राखून खर्च करायला हवे. उधळपट्टी न करता चार पैसे गाठीस ठेवायला हवेत. आपल्या आय आणि व्यय ह्यावर लक्ष ठेवायला हवे. ते केले की संसाराची घडी मोडत नाही. उधार-उसनवारी करावी लागत नाही. कर्जबाजारी व्हावे लागत नाही. इथं एकच करायचं आपलं अंथरुण पाहून पाय पसरायचे.”
सद्पुरुष पुढे म्हणाले, “”आता रामरावांची समस्या ही की, त्याचे परमार्थात, ईश्वर उपासनेत मन लागत नाही. त्या गोष्टी नीट घडत नाहीत. ह्याचं कारण अस्थिर चित्त. ही चित्ताची, मनाची स्थिरता ध्यानाने नामस्मरणाने गुरूकृपेने साधायला हवी. त्यासाठी उपासनेला आवडीची जोड द्यावी. बाह्य गोष्टींकडे धावणाऱ्या मनास संयमाने आवरायला हवे. हा अभ्यास आहे. पण ज्याला परमार्थ जोडायचा असेल त्याने हे प्रयत्न पूरक करायलाच हवे.”
सद्पुरुष पुढे म्हणाले, “”आता तिसरी समस्या आमच्या मारुतीची. त्याचे नाव मारुती पण तब्बेत
तोळामासा. त्याचे आरोग्य एकसारखे बिघडतेय. त्याला कारण शरीरातील पित्ताचे असंतुलन. त्याने खाणे-पिणे, आहार-विहार, व्यायाम ह्यावर लक्ष देऊन पित्त सांभाळायला हवे. म्हणजे त्यास आरोग्याचे वरदान मिळेल.”
असे म्हणून सद्पुरुषाने त्या तिघांकडे पाहात म्हटले, “”काय आता तरी कळला का “त’ सांभाळाचा नेमका अर्थ?” आता तिघांनीही माना डोलावल्या आणि सद्पुरुषाचे आशीर्वाद घेऊन चालू लागले. त्या तिघांच्याही समस्या एकाच उपायाने सुटल्याने त्यांना समाधान लाभले.